
'अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार'; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्वतःकडे घेतली होती. त्यानंतर अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कधी जाणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
जय पवार म्हणाले, “देशातील सर्वाधिक मतांनी सुनेत्रा पवार विजयी झाल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अजित दादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील, असे कोणालाही वाटले नव्हते.” ते पुढे म्हणाले, “अर्थखाते राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत, अशी चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात तसे नाही. दादांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करायचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते.”
जय पवार यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले जाईल,” असे सांगितले.
त्याचबरोबर अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे जय पवार यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना जय पवार म्हणाले, “मी अजित दादांसारखे काम करण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील आणि बारामतीतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून विकासाची गती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी–माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बारामती तालुक्यातील आजी – माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मोठ्या प्रमाणात सदस्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. बारामती पंचायत समितीने हा कर्यक्रम आयोजित केला होता. याचवेळी उपस्थितांसमोर बोलताना जय पवारांनी अर्थखात्याविषयी भाष्य केले.