
'आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर'; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
केडीएमसी आयुक्तांनी एका राजकीय पक्षाच्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिल्याने त्यांच्या प्रशासकीय तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काँग्रेसने या उपस्थितीवर तीव्र आक्षेप नोंदवत आयुक्तांवर थेट टीका केली आहे.
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आरोप केला की, शहरातील नागरिक गंभीर समस्यांचा सामना करत असताना आयुक्तांनी त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे अयोग्य आहे. त्यांनी टीका करत “केडीएमसी आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर” अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसच्या मते, कल्याण-डोंबिवली शहरात पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरणे, रस्त्यांवरील मोठे खड्डे, तसेच अलीकडेच रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याची धक्कादायक घटना अशा अनेक गंभीर समस्या प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देणे अपेक्षित असताना आयुक्त पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याने नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, शिबिराचे आयोजक मात्र या प्रशिक्षणाचा उद्देश नगरसेवकांना विकासकामे, प्रशासकीय प्रक्रिया आणि महापालिकेच्या कामकाजासंदर्भात माहिती देणे हा असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आयुक्तांची उपस्थिती ही प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.
दरम्यान, या उपस्थितीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या मर्यादा आणि तटस्थतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता या वादावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची अधिकृत भूमिका काय असते आणि महापालिका प्रशासन याबाबत कोणते स्पष्टीकरण देते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”