शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, महिलांना महिन्याला 3 हजार देणार...; विधानसभेसाठी मविआकडून पंचसुत्री जाहीर!
काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे बुधवारी (ता.६) प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात ‘मविआ’ची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभेला’ सुरुवात झाली असून, या स्वाभिमान सभेत विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसुत्री जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला, युवक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या पंचसुत्री योजनेचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होणार? हे येता काळच ठरवणार आहे.
विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसुत्री जाहीर
– राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.
– युवकांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देणार.
– कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे देणार.
– महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
– जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त सभा
राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून, महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार
आज आम्ही दिक्षाभुमीवर गेलो होतो, बाबासाहेब यांच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, तो हात आम्ही लावू देणार नाही. समतेची लढाई दिक्षाभूमीवर सुरू केली, राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटले, मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असे म्हणत कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी फडणवीसांवर संविधानाच्या मुद्द्यावरुन पलटवार केला आहे.
धारावी पुनर्वसन विकास प्रकल्पाकडे वेधले लक्ष
राहुल गांधी यांना मी विनंती करते की, त्यांनी मुंबईच्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे, मुंबईच्या जमीन विकल्या जात आहेत. मुंबईची लूट केली जात आहे, धारावीला लुटायचे काम सुरू आहे. प्रत्येकाच्या घराची लढाई सुरु आहे, राहूल गांधी तुम्हाला यासाठी यावा लागेल, तुम्हाला या ठिकाणी यावा लागेल आणि लढाई लढावी लागेल, असे म्हणत यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींचे मुंबईतील धारावी पुनर्वसन विकास प्रकल्पाकडे लक्ष वेधले.