
Manoj Jarange Patil,
Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची तारीख येत्या 12 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले. मुंबईत आंदोलन पाच टप्प्यांत होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
“तीन दिवसांत मराठ्यांना मुंबईला नेऊन परत आणणे आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे यावेळी पक्की तयारी करायची आहे,” असे सांगत त्यांनी समाजबांधवांना नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यंदाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असले तरी ते सरकारला प्रभावीपणे जाणवले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. हे शेवटचे आंदोलन असल्याचे सांगत मागण्यांमध्ये कोणतीही माघार घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारला इशारा देताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उल्लेख केला. सरकारला आपल्या ताकदीचा अंदाज असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नियोजनावर भर दिला.
“एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही, दिल्लीसुद्धा हलवू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. मराठा समाजापुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मोटरसायकल आणि इतर वाहनांसह मुंबईकडे जाण्याचा उल्लेख केला. मात्र, आंदोलन शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जरांगे पाटील यांनी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 50 ते 60 वर्षांच्या आतील समाजबांधवांनी मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. तरुण समाजासाठी लढत असताना इतरांनीही समाजाच्या प्रश्नांसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत त्यांनी समाजबांधवांनी आंदोलनासाठी वेळ देण्याची गरज व्यक्त केली.
मुंबईतील आंदोलनासाठी 12 तारखेला तारीख जाहीर केली जाणार असल्याने त्यानंतर आंदोलनाचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या समाजबांधवांसाठी आवश्यक नियोजन आणि तयारी करण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या मागणीसह जात पडताळणी आणि इतर मागण्यांवर सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या नव्या आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.