
Manoj Jarange Patil
दरम्यान, जरांगे यांच्या आगामी आंदोलनावर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील हे स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी आणि स्वार्थासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, आंदोलनाचा मुख्य उद्देश भाजप नेत्यांवर टीका करणे, त्यांना शिवीगाळ करणे आणि स्वतःची राजकीय ओळख निर्माण करणे असा असल्याचा आरोप त्यांनी केला.
Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
‘स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात आहे,’ अशी टीका रहांगडाले यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी अंतरवाली सराटीत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. काही राजकीय नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, ‘आता मागे हटणार नाही’, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींच्या आधारे संबंधितांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
एकीकडे जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाची सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि त्यावर पुढील राजकीय घडामोडी काय होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.