
मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यंदा मुंबईत आंदोलन न करता अंतरवाली सराटीतच उपोषण करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली. मात्र, सरकारकडून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुंबईत येण्याचा इशारा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रक्षाबंधनानिमित्त भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते राखी बांधल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाबाबत भाष्य केले. मुंबईत सणासुदीचा काळ सुरू असून पुढे गणेशोत्सव, दहीहंडी यांसारखे मोठे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये, अशी विनंती आम्ही केली होती. त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवत अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे लाड म्हणाले.
दरम्यान, सरकारने मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात काढलेले काही जीआर ग्रामीण भागातील प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचले नसल्याची कबुलीही लाड यांनी दिली. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहिल्यामुळे काही ठिकाणी अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी भूमिका लाड यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करतील, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चेवरही लाड यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने मागील काही महिन्यांत आरक्षणासंदर्भात आवश्यक ते निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.