
motional appeal to voters for the Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून आता विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसते. “राष्ट्रवादीला एक मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली,” असा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या संवादात, प्रचार साहित्यात आणि गावभेटींमध्ये हा सूर ठळकपणे उमटत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान
मात्र, हा प्रचाराचा मार्ग खुद्द अजितदादांच्या विचारधारेच्या विरोधात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भावनिक लाटांवर स्वार होण्यापेक्षा कामगिरीची मांडणी, आकडेवारी आणि ठोस विकासकामे समोर ठेवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने भावनिक मतदान मागणे हे त्यांच्या राजकीय संस्कारांशी विसंगत असल्याची भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
पुणे जिल्हा हा नेहमीच मुद्देसूद आणि तुलनात्मक मतदानासाठी ओळखला जातो. सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर आधारित राजकारण येथे प्रभावी ठरले आहे. अशा जिल्ह्यात भावनिक आवाहनांवर आधारित प्रचार कितपत परिणामकारक ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : आपण कशाला मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांनी काढून घेतले अंग
विरोधी पक्षांकडूनही या बदललेल्या प्रचारशैलीवर सूचक टीका होत असून, “कामाचा वारसा सांगणाऱ्यांनी कामाचे तपशील मांडावेत,” अशी मागणी अप्रत्यक्षपणे पुढे येत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससमोरील नेतृत्वाचा प्रश्न, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आव्हान आणि निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न या भावनिक प्रचारामागे असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच, अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात संवेदनशीलता वाढली असली, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.