आमदार रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पत्रकार परिषद मत मांडले (फोटो - सोशल मीडिया)
रोहित पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचे स्मारक उभारण्यासाठी भेट दिली. आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “घाईघाई विमानाने ते निघाले आणि ही दुर्देवी घटना घडली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्या विचारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. राजकारणातील मोठे नेते अजित पवार होते. राजकीय दृष्टीकोनातून जर तुम्हाला त्यांना आदरांजली द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं,” असं आवाहन रोहित पवारांनी केले.
हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल होणार असल्याची चर्चा होती. यावरुन शपथविधीसाठी घाई करण्यात आल्याचे देखील बोलले जात होते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार म्हणाले की, “उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पद हे सुनेत्रा पवारांकडेच राहिले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला यावर थेटपणे बोलता येत नाही,” असे सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
हे देखील वाचा : आपण कशाला मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांनी काढून घेतले अंग
पुढे रोहित पवार म्हणाले की, “लोकप्रतिनिधी हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून येत असतात, जर आमदारांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. तसेच विविध सेलच्या अध्यक्षांनीही सुनेत्रा पवार यांचेच नाव पुढे केल्याचे कळते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच ही जबाबदारी द्यायला हवी. कुणी कितीही काही प्रयत्न केले तरी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक आणि परिवाराचे म्हणणे कुणीही डावलू शकत नाही. सुनेत्रा काकीच त्या पक्षाच्या प्रमुख राहतील,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.
विलीनीकरणाची चर्चा झाली नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार का? याबाबत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, “ही चर्चा कुठेच नाही. अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यापरिने प्रयत्न करत आहेत की नाहीत, याबाबत आज नेमके सांगता येणार नाही. पण ९ फेब्रुवारी रोजी तेरावे झाल्यानंतर आम्ही परिवारात याबाबतची चर्चा करू. आतापर्यंतही यावर चर्चा झाली नाही,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते अगदी शरद पवार देखील ही चर्चा झाली असल्याचे बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






