 
        
            राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
सुप्रीम कोर्टाने दिले निवडणुका घेण्याचे आदेश
महायुती स्वतंत्रपणे लढणार की एकत्रित याची चर्चा सुरू
मुंबई: येत्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुका महायुतीबरोबर लढणार की स्वतंत्र, याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांना कठोर तंबी दिली असून, मुंबईत थांबू नका, मतदारसंघात जाऊन कामाला लागा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या तयारीवर भर दिला. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका. विनाकारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात पक्षाचे काम करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
पक्षाची बैठक प्रत्येक मंगळवारी पार पडते आणि यावेळी ती रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झाली. अजित पवार यांनी आमदारांना सांगितले, “आपापल्या मतदारसंघात तयारी सुरू करा. निवडणुकांचे आव्हान मोठे आहे, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहावे, अशा सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या.
अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
वारजेतील चौधरी चौकापासून दौऱ्याची सुरुवात करताना अजित पवार यांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
धायरी व नांदेड सिटी परिसरात पाहणीदरम्यान वारजे-शिवणे पुलाच्या उंचीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाची उंची वाढवण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. तसेच धायरी डिपी रोड आणि कात्रज चौक उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेत कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पाहणीदरम्यान पीएमआरडीएचे एक अधिकारी वेळेवर न आल्याने पवार संतप्त झाले. वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर फटकारले.






