
"भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा"; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर
भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने मोठी राजकीय चाल खेळत पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची खुली ऑफर दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना थेट आवाहन केले. त्यांनी म्हटले की, गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना अनेकांमध्ये आहे. पंकजा मुंडे यांनाही पक्षात न्याय मिळत नसल्याचे वाटत असेल, तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि नेतृत्वाशी चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवरही भाष्य केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये सुरू होणाऱ्या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी वाढीव निधी, तसेच ओबीसी समाजातील रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरावा, अशा मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले. खराब रस्त्यावरून प्रवास करताना “आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं,” असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळाल्याचे सांगत त्यांनी विकासासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचा संदेशही दिला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पंकजा मुंडे या भाजपमधील प्रभावी ओबीसी नेत्या असून त्यांच्या नेतृत्वावर मोठा समर्थक वर्ग विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत त्या जर पक्षांतराचा निर्णय घेतला, तर त्याचा राज्याच्या राजकारणावर आणि विशेषतः ओबीसी मतदारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसची ही ऑफर केवळ राजकीय विधान नसून आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.
मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप काँग्रेसच्या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्या या प्रस्तावाकडे कशा प्रकारे पाहतात आणि पुढील काळात कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.