
'भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला'; पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमावर कन्हैयाकुमारांचा दावा
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, यावेळी ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी देशातील पहिली शाळा सुरू केलेल्या पुण्यातच राहुल गांधी सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार असल्याचे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपने राहुल गांधींचा धसका घेतला असल्याचे म्हंटले आहे.”
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना भाजपावर जोरदार टीका केली. ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमामुळे भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, कार्यक्रमात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, कितीही अडथळे किंवा अपप्रचार झाला तरी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.
कन्हैया कुमार यांनी यावेळी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावरही जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले, “मनुवादी विचाराने देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद केली आहे. देशात दर एक तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत. ‘ना पढे है, ना पढने देंगे’, असे यांचे धोरण असून यांचे पदवी प्रमाणपत्रही नकली आहे. भाजपा नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही.”
ते पुढे म्हणाले, “आज शिक्षण महागडे झाले आहे, ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार? खाजगी शाळांना आमचा विरोध नाही पण सरकारी शाळा बंद होता कामा नये. महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वस्ती नाही. परिक्षांचे पेपर फुटत आहेत, या सरकारला दहावीची परिक्षासुद्धा घेता नाहीत. CBSE च्या परिक्षेतही घोटाळा झाला. शिक्षण आमचा अधिकार आहे तो विषेशाधिकार बनवला जात आहे.”
‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम यापूर्वीही विविध ठिकाणी घेण्यात आला असून, त्याला अडथळे आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कन्हैया कुमार यांनी केला. पुण्यात कार्यक्रमासाठी परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपाने धसका घेतला आहे. कोटापासून सुरु झालेला कार्यक्रम प्रत्येकवेळी अडवण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत पण अशा प्रयत्नाने कार्यक्रम थांबणार नाही तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार यात शंका नाही.”
Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
“सोशल मीडियावर भाजपाने एक व्हीडिओ अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरु केला आहे पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, ते स्वतः येत आहेत. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत आणि पुण्यातील कार्यक्रम नियोजित पद्धतीने होईल, असा विश्वास कन्हैया कुमार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.