
Raj Thackeray
Raj Thackeray on DJ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सण, संस्कृती आणि DJ-डॉल्बीच्या वापरावरून परखड भूमिका मांडली आहे. ठाण्यात आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सण साजरे करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. DJ आणि डॉल्बी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग नसून उत्तरेकडील संस्कृती महाराष्ट्रात आणली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
गणेशोत्सवाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, गणपती श्रद्धेने घरी आणायचा आणि विसर्जनाच्या वेळी DJ-डॉल्बीच्या तालावर नाचायचे, यात नेमका आनंद काय, असा सवाल त्यांनी केला. आपल्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. विसर्जनाच्या वेळी घर रिकामं झाल्यासारखं वाटतं, उत्साह कमी झाल्यासारखं जाणवतं, असेही त्यांनी सांगितले.
गोविंदा उत्सवातील काही कार्यक्रमांमध्ये महिलांना व्यासपीठावर नाचवण्याच्या प्रकारावरही त्यांनी आक्षेप घेतला. ही पद्धत उत्तर भारतात चालते, मग महाराष्ट्राने ती स्वीकारण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सण कसे साजरे करायचे यासाठी एक प्रकारचा प्रोटोकॉल असावा आणि महाराष्ट्राने आपल्या परंपरेनुसार उत्सव साजरे करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
DJ, डॉल्बी आणि लेझर लाईटच्या अतिवापराबाबतही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो, तर लेझर लाईटमुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि आज उत्सव कुठे पोहोचला आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात DJ वाजवण्यावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. कायद्याने DJ बंद करता येत नाही, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर नागपूरमध्ये DJ बंद कसा झाला, असा सवाल त्यांनी केला.
Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आणखी एका मुद्द्यावर सावध केले. सणांच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत अलीकडे काही घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी सुजाण हिंदू आणि सुजाण मुस्लिमांनी अफवा किंवा कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन केले. उत्सव साजरा करणे योग्य आहे; मात्र धर्मांधता समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.