
'सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली'; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याचे सांगत टीका केली आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्या म्हणाल्या, “मिसिंग लिंकच्या कारनाम्यानंतर महायुती सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या येत की मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे तर होणारच होतं!”
#MissingLink च्या कारनाम्यानंतर महायुती सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या येत की मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे तर होणारच होतं! समृद्धी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये MEIL… pic.twitter.com/waq5o0UnV9 — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 12, 2026
त्या म्हणाल्या, “समृद्धी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये MEIL (Megha Engineering & Infrastructure Ltd.) एक प्रमुख कंत्राटदार कंपनी होती, या कंपनीने जवळपास ५८५ कोटी रुपये भाजपला इलेक्टोरल बॉण्ड्च्या माध्यमातून दिले. जर कंपनींच्या मागील कामांचा दर्जा न पाहता फक्त इलेक्ट्रॉल बॉण्ड्च्या बदल्यात कामं दिलं जात असेल तर त्या कामांचा दर्जा काय राहील हे वेगळं सांगायला नको.”
त्या पुढे म्हणाल्या, “सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली; मग जनतेच्या हाताला काटेच येणार! या सगळ्यात कंत्राटदार समृद्ध झाले आहे बाकी सामान्य लोकांचे जीव मात्र स्वस्थ झाले आहे.”
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असले तरी संबंधित यंत्रणांकडून या दाव्यांवर अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे.