
Sharad Pawar, PM Modi,
या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मोठी मागणी केली आहे. ” केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी पवार यांनी यांनी केली.
आज (14 मे) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील आणीबाणीवर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “ सध्या देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावावी आणि त्या बैठकीला पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांत सर्वपक्षीय बैठका झाल्या, मात्र त्यात पंतप्रधान उपस्थित नव्हते. पण आताची परिस्थिती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी मिळून निर्णय घेतले पाहिजेत.”
सरकारकडून इंधन बचतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर भाष्य करताना शरद पवार यांनी काही मंत्र्यांच्या भूमिकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आज सकाळपासून टीव्हीवर पाहतोय, कोणी मोटारसायकलवरून जात आहे, कोणी पायी चालत आहे. एका मंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्या ताफ्यात आधी १७ गाड्या होत्या आणि आता त्या ८ वर आणल्या. हे ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे आधी १७ गाड्या होत्या, हेच आश्चर्यकारक आहे. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर असायला हवा.” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला
मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांनी वापरलेल्या भाषेबाबतही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “राहुल गांधी हे संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे. अशा पदावरील व्यक्तीबाबत अयोग्य भाषा वापरणे चुकीचे आहे,” असही त्यांनी नमुद केलं.
देशातील आर्थिक परिस्थिती, रुपयाची घसरण आणि युद्धजन्य वातावरणावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “रुपया खाली का येतो, याचाही विचार झाला पाहिजे. इराणसारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतोच. पण निवडणुका संपल्यानंतर अचानक सरकारला परिस्थितीचे गांभीर्य जाणवू लागले. निवडणुकांच्या काळात जनतेला याची जाणीव करून देण्यात आली नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन चुकीचे नाही. सोनं खरेदी करू नका, याचा अर्थ रुपयाची किंमत घसरू नये, हा आहे. हा सल्ला चुकीचा नाही. मात्र, एका बाजूला काटकसरीचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगळेच चित्र दिसत असेल, तर प्रश्न उपस्थित होतात,” असे ते म्हणाले.