
सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हटवून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले, तसेच आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले.
या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सरकारवर लोकशाही आंदोलन दडपण्याचा आरोप करत म्हटले की, “आपले काळे कुकर्म झाकण्यासाठी पांढऱ्या चादरी घेऊन आलेले हे सरकार पुरस्कृत गुंड आहेत.” त्यांनी पुढे सरकारची भूमिका असंवेदनशील आणि निर्लज्ज असल्याचे म्हटले.
आपले काळे कुकर्म झाकण्यासाठी पांढऱ्या चादरी घेऊन आलेले हे सरकार पुरस्कृत गुंड आहेत,.
लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन ज्या भ्याड पद्धतीने आज भाजपने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला याची निंदा फक्त भारतात नाही ती आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे.
सरकार नावाची यंत्रणा फक्त असंवेदनशीलच… pic.twitter.com/RA1MIMohzL — SushmaTai Andhare (@andharesushama) July 18, 2026
अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये असा आरोप केला की, शांततापूर्ण आंदोलनाला भ्याड पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न झाला असून त्याची निंदा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे. “पाशवी बहुमत हे लोकशाहीसाठी घातक असते,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, आंदोलनस्थळी आणखी एक वाद निर्माण झाला. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दिपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याचवेळी एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने केवळ नियमित वैद्यकीय तपासणीचे निर्देश दिले होते; रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश नव्हते. तसेच काही वैद्यकीय अहवालांबाबत शंका असल्याने स्वतंत्र प्रयोगशाळेतून तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामुळे जंतरमंतरवरील आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका सुरू झाली आहे.