'छेड काढणारा हिंदू असो वा मुस्लिम, तिथेच चोप दिला पाहिजे'; सुजय विखेंनी थेट आमदार संग्राम जगतापांचेच कान टोचले!
शिर्डीतील या जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून सुजय विखे पाटील यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत थेट आमदार संग्राम जगताप यांना लक्ष्य केले. विखे पाटील म्हणाले, “संग्राम भैय्या तुम्ही नगरमध्ये पाहत असाल आणि मी राहुरी, शिर्डी, श्रीरामपूर भागात पाहतोय की, कॉलेज सुटलं की काही ठराविक पोरं डोळ्यावर गॉगल लावून आणि बाईक घेऊन तिथे फिरत असतात. मुलींची छेड काढणे, शिट्ट्या वाजवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा टवाळखोरांना आधी तिथेच चोप दिला पाहिजे.” विखे पाटील यांच्या या थेट विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
‘लव्ह जिहाद’ सोबतच ‘टवाळखोरांचा’ बंदोबस्त करा- आपल्या आक्रमक भाषणात सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना थेट निर्देश दिले. “आपली भूमिका केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बोलण्यापुरती मर्यादित नसावी. कॉलेजच्या बाहेर उभे राहून महिलांची छेड काढणाऱ्या प्रत्येक टवाळखोराला ठोकून काढा, तरच तुम्ही खरे हिंदू आहात. जो कोणी आपल्या आई-बहिणीची छेड काढेल, मग तो हिंदू असला तरी त्याचा बंदोबस्त करण्याचे काम सकल हिंदू समाजाने केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
धर्माच्या रक्षणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. “धर्माच्या संरक्षणासाठी नक्कीच लढा, पण तितक्याच तत्परतेने आपल्या महिला भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठीही पुढे या. जो कोणी मुलींची छेड काढेल, मग तो हिंदू असो वा मुसलमान, त्याला आधी ठोकून काढा आणि मग माझ्याकडे या… तुमच्या पाठीशी सुजय विखे खंबीरपणे उभा आहे,” अशी जाहीर हमी देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
शिर्डीतील या मोर्चात सुजय विखे यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि सर्वसमावेशक भूमिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे कान टोचल्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच






