
खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान उद्भवलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर हे प्रकरण अधिक चिघळलं होतं. 27 डिसेंबर 2025 रोजी आमदार थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते असं दाव्यात नमूद करण्यात आले आहे. तटकरे रायगड जिल्ह्याचे ‘आका’ असल्याप्रमाणे वागतात आणि काही कार्यकर्त्यांच्या हत्यांमागे त्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केल्याचं तटकरेंनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवल विकोपाला जात आहेत. या सगळ्या संवेदनशील प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार तटकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे विधान पूर्णपणे खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दशकांच्या सार्वजनिक जीवनात आपण विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून अशा आरोपांमुळे आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीशी जोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोपही दाव्यात करण्यात आला आहे.
न्यायालयाकडे तीन प्रमुख मागण्या
दाव्यात खासदार तटकरे यांनी न्यायालयाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार थोरवे यांनी केलेले आरोप खोटे व मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे, बदनामी करणारे व्हिडिओ सर्व माध्यमांवरून हटवावेत आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मानसिक व सामाजिक नुकसानीपोटी 65 कोटी 3 हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.