Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, राज्य सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी लवकरच प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे.
उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार, ते उद्या किंवा परवा अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या मार्गी लावण्यासाठी आपण जरांगेंच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला.
मनोज जरांगे पाटील आणि आपले राजकीय संबंधांपलीकडचे संबंध असल्याचं सांगत उदय सामंत यांनी त्यांना एक विनंती केली. कोणत्याही गैरसमजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कठोर वक्तव्य करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं सांगत, गैरसमज दूर करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं.
परभणीतील शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्यावरूनही सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आला होता. सात जुलै रोजी कार्यक्रम होणार होता; मात्र शिंदे आजारी असल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे या मेळाव्याचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं सामंत म्हणाले.
मराठा समाजाला कमी लेखण्यासाठी किंवा आरक्षणाच्या मागणीवर संभ्रम निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?
उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादाचाही उल्लेख केला. आंदोलन आणि मागण्यांबाबत चर्चा होत राहील, मात्र मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी, अशी शिंदेंची भूमिका असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत, असा विश्वास जरांगे पाटील यांनी ठेवावा, असंही सामंत म्हणाले. आता उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यात होणारी संभाव्य भेट आणि त्यातून सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






