
मोठी बातमी! ‘फडणवीस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ नयेत म्हणून…’; उद्धव ठाकरेंचा विमानातील भेटीनंतर मोठा राजकीय दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. हिंगोलीतील सभेत बोलताना त्यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली. काही खासदार आणि आमदार फुटले म्हणजे शिवसेना संपत नाही, कट्टर शिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबा झालेल्या विमानातील भेटीबाबतही मोठे भाष्य केले.
यावेळी, हिंगोलीत यापूर्वीही बंडखोरी झाल्याचा उल्लेख करत त्यांनी गद्दारांना जनतेसमोर जाण्याची हिंमत नसल्याचा आरोप केला. मात्र, शिवसैनिकांनी प्रत्येक वेळी पक्षाशी निष्ठा राखल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
शुक्रवारी मुंबईहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या भेटीचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्यांनी “उच्चस्तरीय चर्चा झाली” असे उत्तर दिले होते.
‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला
याच पार्श्वभूमीवर त्यांनी दावा केला की, “हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे.” फडणवीस भविष्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकतात, अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्रातच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आले. यामागे केंद्रीय नेतृत्वाचे राजकीय गणित असू शकते, असा दावा त्यांनी केला.
“हा माझा आरोप नाही, हा माझा समज आहे. तो खरा असू शकतो किंवा नसू शकतो. पण निवडणुका नसताना खासदार फोडण्याची गरज काय होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“या, परत या… शिवसेना आपलीच”; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भावनिक साद
ठाकरे म्हणाले की, फुटलेल्या खासदारांना थेट भाजपमध्ये न घेता शिंदे गटात पाठवण्यामागे भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाचे गणित असू शकते. पंतप्रधानपदाच्या निवडीच्या वेळी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन ही रणनीती आखली गेल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.