'विमानापेक्षा इमान महत्त्वाचं'; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून प्रवास केल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली होती. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
या विमानप्रवासाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेने त्यांना एकाच विमानातून प्रवास करण्याचं तिकीट दिलं होतं, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. त्यामुळे आज ते गटांगळ्या खात आहेत. पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देवेंद्रजी खूप हुशार आहेत. 2019 मध्ये कपटी मित्र किती घातक ठरू शकतो, हे त्यांनी पाहिलं आहे.”
उद्धव ठाकरे यांनी “आमची उच्चस्तरीय चर्चा झाली,” असे म्हटल्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं,” असा टोला लगावला.
उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून ‘या’ शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी
मुंबईहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच इंडिगो विमानातून प्रवास केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे अन्य नेतेही उपस्थित होते.
या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “आमची भेट झाली, हीच मोठी बातमी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती. तर उद्धव ठाकरे यांनी “आमची उच्चस्तरीय चर्चा झाली,” असे सांगत राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.
राज्यात नुकतेच ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित विमानप्रवासाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे सांगत कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले आहे.






