
उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून 'या' शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी
राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ईशान्य मुंबईनंतर आज त्यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. याच सभेत त्यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना तयारीला लागण्याचे आवाहन करत त्यांच्या संभाव्य उमेदवारीचे संकेत दिले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी दौऱ्यावर निघालो आणि काहींनी शिवसेना संपल्याची चर्चा सुरू केली. पण कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे गद्दारांना थारा देऊ नका.”
ते पुढे म्हणाले, “तुमचा खासदार जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा. गद्दारी का केली, याचे उत्तर मागा. पुढील तीन वर्षे हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवावा.”
उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधत, “भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि शेतकऱ्याला योग्य दाम देणारं हिंदुत्व आहे,” असे म्हटले.
राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका करत, “राम मंदिराच्या नावावर जनतेची फसवणूक झाली आहे. ही गद्दारी फक्त माझ्याशी नाही, तर हिंदुत्वाशी झाली आहे,” असा आरोप केला.
वाशिम-यवतमाळ भागातील शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफी नव्हे, तर कायमस्वरूपी कर्जमुक्ती मिळाली पाहिजे.”
‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात
सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उद्देशून, “आतापासूनच तयारीला लागा. पुढील तीन वर्षे तुमच्या हातात आहेत,” असे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले. “जो गरजते हैं, वो बरसते नहीं. आम्ही टीकेला उत्तर देणार नाही, कामातूनच उत्तर देऊ. ४० आमदारांपासून सुरुवात करून आज आमची संख्या ६० वर पोहोचली आहे. आगामी काळात आणखी अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा त्यांनी केला.