'गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..'; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना, “गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे त्यांना जाब विचारा,” असा थेट आदेश दिला.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली. “दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली होती. तेव्हा त्यांनी मुलीची सोयरिक जुळवायची असल्याचे सांगितले होते. मला वाटले मुलीची सोयरिक जुळवत आहेत, पण दोन दिवसांनी कळलं की स्वतःचीच सोयरिक जुळवली. आता गेले सासरी, तिकडेच नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होता, आता तिकडे गाढवाचं जीवन जगा,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी शिवसैनिकांना पुढील तीन वर्षे बंडखोर खासदारांना सातत्याने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. “हा गद्दार जिथे सापडेल तिथे त्याला जाब विचारा, मी तुला निवडून आणलं, मग गद्दारी का केली? मला पैशांची लालसा असती तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे प्रत्येक गद्दाराला जाब विचारण्याचा कार्यक्रम पुढील तीन वर्षे सुरू ठेवा,” असे ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “निवडणुका नसतानाही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची घोषणा ‘अब की बार ४०० पार’ होती, पण मी म्हणालो होतो ‘अब की बार तडीपार’. त्यांना संविधानात बदल करून हुकूमशाहीची व्यवस्था आणायची आहे. गुलामगिरी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत,” असा आरोप त्यांनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. “हे काम सोपं नाही. गद्दारी का झाली, हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. पुढचा खासदार भगव्याशी कट्टर निष्ठा ठेवणारा असला पाहिजे. त्यामुळे आजपासूनच प्रत्येक शिवसैनिकाने कामाला लागावं,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
‘राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली याचा पुरावा काय?’; नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल






