
ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते
Dr. Ambedkar paid visit to the tomb (Samadhi) of Saint Eknath at Paithan,1949 pic.twitter.com/Pu4rbAvQBm — Congress (@INCIndia) April 14, 2016
बाबासाहेबांच्या बुद्धीचे तेज अवघ्या विश्वात आजही व्यापून राहिलेले आहे. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश, आपल्या कार्याची नेमकी दिशा या साऱ्यांचे भान बाबासाहेबांना होते; बुद्धिप्रामाण्यवाद त्यांच्या ठायीठायी वसलेला होता. म्हणूनच पैठणला बाबासाहेब भाबड्या श्रद्धेपोटी आलेले नव्हते, तर ज्या समतेच्या मार्गावर त्या काळी बाबासाहेब क्रांती करत जात होते, त्याच मार्गावरून साडेतीनशे वर्षे आधीच चालणाऱ्या एका देवमाणसाप्रती असणाऱ्या आपलेपणाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतूनच बाबासाहेब पैठणला नाथांच्या दर्शनाला आले होते. एका महामानवाने दुसऱ्या महामानवाचा केलेला हा सन्मानच होता.
साधारणतः हा काळ होता १९४९ च्या आसपासचा. औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाचे काम सुरू झाले होते. त्या निमित्ताने बाबासाहेबांच्या शहरात चकरा होत होत्या. सुरुवातीच्या काळातच पैठणला जाण्याची इच्छा प्रकट केली. बाबासाहेबांनी एकनाथांच्या समाधी मंदिरास भेट दिली, त्या वेळेस त्यांच्या सोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड, कमलाकांत चित्रे, डॉ. राजभोग व इतर कार्यकर्ते होते.
संत एकनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बाबासाहेब मुद्दामहून पैठणला आले, ही एक क्रांतिकारी घटनाच आहे. आपल्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बाबासाहेब पैठणला येतात, ही अपूर्व घटना आहे. पैठणला येण्याचा बाबासाहेबांचा दुहेरी उद्देश असावा. एक तर, संत एकनाथांच्या मानवतावादी कार्याला मानवंदना द्यावी व या पुण्य महात्म्याच्या कर्मभूमीचे दर्शनही घ्यावे. दुर्दैवाने या भेटीविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्या वेळेस गावातील काही कार्यकर्त्यांशी किंवा काही प्रतिष्ठित लोकांशी बाबासाहेबांची भेट झाली होती का? ते लोक कोण होते, त्यांच्यात काय वार्तालाप झाला असेल किंवा समाधी मंदिरात त्यांच्या सोबत असणाऱ्या व जमलेल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी काय मार्गदर्शन केले असेल? त्या सगळ्या बाबी आज काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत.