Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली, सौजन्य : आयएएनएस
भारताने रविवारी एशियन्स गेम (Asian Games 2026) मधील ‘ए’ गटातील आपल्या पहिल्या सामन्यात इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली. या विजयासह पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स २०२६ मध्ये आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याची जोरदार सुरुवात केली आहे.
भारतीय संघाच्या वतीने ८ खेळाडूंनी गोल केले. त्यात सर्वाधिक ४ गोल दिलप्रीत सिंगच्या नावे राहिले. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळीस सुरुवात केली. शिलानंद लाकडाने सहाव्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने वाचवलेल्या ड्रॅग फ्लिक रिबाउंडचे गोलमध्ये रुपांतरण केले. त्यानंतर १२ व्या मिनिटाला अभिषेकने ही आघाडी दुप्पट केली. भारताने ब्रेकपर्यंत इंडोनेशियाच्या खेळाडूंवर वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांना २-० अशी आघाडी कायम राखता आली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने आक्रमक होत १८ व्या आणि १९ व्या मिनिटाला गोल करत आपले खाते खोलले. राजिंदर सिंगने १९ व्या आणि मनदीप सिंगने २१ व्या मिनिटाला गोल करत चेंडूवरील नियंत्रण कायम राखले. हरमनप्रीत सिंगने २८ व्या मिनिटाला एक पेनल्टी कॉर्नर मिळवले, अशाप्रकारे भारताने हाफ टाइमपर्यंत आपली आघाडी ७-० अशी नेली होती.
इंडोनेशियाने सामन्यातील आपला पहिला गोल तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला केला. त्यांचा कर्णधार औलिया अल अर्दने ३३ व्या मिनिटाला एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरण केले. यावेळी भारताने व्हिडीओ रेफरलची मागणी केली, पण निर्णय इंडोनेशियाच्या बाजूने लागला.
या धक्क्यातून सावरत भारताने लगेचच हल्ला सुरू केला. शिलानंद लाकडाने सामन्यातील आपला दुसरा गोल (३५ व्या मिनिटाला) केला आणि दिलप्रीतने आपली हॅटट्रिक ३७ व्या मिनिटाला पूर्ण केली. त्यानंतर एका मिनिटाच्या हाकेवर म्हणजेच ३८ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी १०-१ पर्यंत नेली. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने इंडोनेशियाला कोणत्याच पुनरागमनाची संधी दिली नाही. उलट भारतानेच तीन गोल आणखीन केले व हा सामना १३-१ असा आपल्या नावे केला. आता भारताचा पुढील सामना २२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.






