
"भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा"; गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता (Photo Credit- X)
गौतम गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीवर केकेआरच्या प्रभावाबाबत सविस्तर भाष्य केले. गंभीर म्हणाला, “मी आज ज्या पदावर आहे, त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा खूप मोठा वाटा आहे. केकेआरने मला एक खंबीर नेता (Leader) म्हणून घडवले. माझ्यामध्ये आज जे नेतृत्वगुण दिसतात, ते केकेआरच्या कार्यसंस्कृतीमुळेच विकसित झाले आहेत.” केकेआरसोबतचा त्यांचा यशस्वी काळ हाच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी महत्त्वाचा निकष ठरल्याचेही त्याने यावेळी मान्य केले.
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि विशेष म्हणजे या तिन्ही विजयांमध्ये गौतम गंभीरचा प्रत्यक्ष सहभाग होता 2012 आणि 2014 गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली (कर्णधार) केकेआरने जेतेपद मिळवले. गौतम गंभीर मेंटॉर म्हणून संघात परतला आणि शाहरुख खानच्या या फ्रेंचायझीने तिसऱ्यांदा करंडकावर नाव कोरले. या यशाने गंभीर यांची रणनीती आखण्याची क्षमता सिद्ध केली, ज्याचा फायदा त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षकपद मिळवण्यात झाला.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने यशाची शिखरे सर केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकताच पार पडलेला 2026 चा टी-20 विश्वचषक अशा दोन सलग आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकल्या आहेत. एकाच प्रशिक्षकाच्या काळात दोन आयसीसी जेतेपदे मिळवणारे गंभीर हा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे.
गौतम गंभीर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. सलग दोन जागतिक विजेतेपदानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष 2027 च्या विश्वचषकाकडे लागले आहे. गंभीरच्या रणनीतीमुळे भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होणार का, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.