पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पाकिस्तानने आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात पाकिस्तानचा सामना युएईशी झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आणि पाकिस्तानने विजय मिळवला. मात्र या सामन्याआधी पाकिस्तानने बरीच नाटकं करत पुन्हा एकदा सर्वांचा रोष ओढवून घेतल्याचे दिसून आले. युएईवर ४१ धावांनी घेतलेल्या विजयाने पाकिस्तानला सुपर फोरमध्ये स्थान मिळवून दिले. आशिया कप २०२५ चा सुपर फोर सामना २० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि यात आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी
आशिया कपमधील आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. तेथे सर्व चार संघ एकमेकांशी भिडतील. भारतीय संघ त्यांच्या पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानशी भिडेल. हा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री ८:०० वाजता सुरू होईल. हा पाकिस्तानचा पहिला सुपर फोर सामनादेखील असेल.
भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजीही एकमेकांशी भिडले होते. गट अ मधील स्थानामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर झाली. दुबईमध्ये खेळलेला तो सामना भारताने ७ विकेट्सने सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने फक्त १२७ धावा केल्या. त्यांच्या फलंदाजांकडे भारताच्या फिरकी गोलंदाजीला उत्तर नव्हते. भारतीय संघाने १६ व्या षटकात लक्ष्य गाठले. यामुळे आता बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ उत्सुक असणार आणि सध्या दोन्ही देशांमधील असलेले तणावाचे वातावरण पाहता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटू शकतं यात काहीच शंका नाही.
आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येऊ शकतात. आशिया कपचा अंतिम सामना सुपर ४ मधील अव्वल दोन संघांमध्ये खेळला जाईल. गट ब मधील सुपर ४ साठी पात्र ठरणाऱ्या संघांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणतेही दोन संघ पुढील फेरीत पोहोचू शकतात. भारतीय संघ २४ आणि २६ सप्टेंबर रोजी सुपर ४ चे इतर दोन सामने खेळेल. प्रेक्षकांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान ही नेहमीच पर्वणी ठरली आहे. पण सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सामन्यांदरम्यानही तणावाचे वातावरण दिसून येत आहे.