
अंतिम सामन्यातील अटीतटीच्या लढतीत ‘समर्थ सांगलीकर’ संघाने ‘नवराई’ संघाचा अवघ्या ८ धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत रोमांचक वातावरणात झालेल्या या सामन्यांनी क्रिकेटप्रेमी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दर्दी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांसह संघमालकांनी एकच जल्लोष करत या संस्मरणीय विजयाचा आनंद साजरा केला.
किरकोळ दुखापतीने उघड केला १० वर्षांपासूनचा लपलेला आजार; क्रिकेटपटूचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल
७० हून अधिक कलाकारांचा सहभाग
अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेमुळे सांगलीतील क्रिकेट मैदानावर अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीचे तारांगण अवतरले होते. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता सिद्धार्थ जाधव, स्नेहल तरडे, शशांक केतकर, सौरभ गोखले, हार्दिक जोशी, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यासह ७० हून अधिक मराठी चित्रपट कलाकारांनी या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला.
हे ठरले सिरीजमधील ‘बेस्ट’
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार-खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब यांना सन्मानित करण्यात आले. संजय जाधव यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अभिनेत्री प्रतिक्षा जाधव हिची निवड झाली. प्रवीण तरडे यांना उत्कृष्ट यष्टिरक्षकाचा पुरस्कार, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ‘राणादा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी याला सन्मानित करण्यात आले.
Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
डॉ. विश्वजीत कदम विरुद्ध प्रवीण तरडे संघाचा सामना ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
या क्रिकेट लीगमधील सर्वात रंगतदार आणि लक्षवेधी सामना म्हणजे आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील आमदार-खासदारांचा संघ आणि कॅप्टन प्रवीण तरडे यांच्या नेतृत्वाखालील कलाकारांचा संघ यांच्यातील विशेष सामना ठरला. या सामन्यात नाणेफेक जिंकून डॉ. विश्वजीत कदम यांच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मैदानावर चौकार-षटकारांच्या फटकेबाजीसोबतच झेलबाद, झेल सोडण्याची ‘अॅक्टिंग’ आणि नो-बॉलमुळे निर्माण झालेली मजेशीर परिस्थिती यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. डॉ. विश्वजीत कदम यांच्या संघाकडून स्वतः डॉ. कदम यांच्यासह खा. विशाल पाटील, धैर्यशील माने, आ. रोहित पाटील, आ. सुहास बाबर, आ. सत्यजीत देशमुख, आ. राहुल आवाडे आणि विशेष म्हणजे उद्योजक संजय घोडावत यांनी मैदानात उतरून खेळाचा आनंद घेतला. या संघाने सर्वाधिक १३० धावांची विक्रमी धावसंख्या उभारत सामन्यात रंगत निर्माण केली.