(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका निवेदनात टीटीपीने म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही क्रीडा उपक्रमाच्या विरोधात नाही, परंतु पाकिस्तान सरकार देशात सर्व काही ‘सामान्य’ असल्याचे जे नाटक करत आहे, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही गॅरंटी घेत नाही. त्यामुळे परदेशी क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात पाठवू नये. जर त्यांना काही झाले, तर त्याची जबाबदारी आमची नसेल.”
यावेळच्या पीएसएलमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. त्यात ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांची नावं चर्चेत आहेत. धमकी मिळूनही स्टीव्ह स्मिथ पाकिस्तानात पोहोचला आहे. त्याचबरोबर बांगलादेशमधील ६ प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर देशांतील खेळाडूही पाकिस्तानात पोहोचले आहेत, मात्र या धमकीनंतर त्यांच्या मनात भीतीचे सावट आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार असल्याचं समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पश्चिम आशियातील तणावाचे कारण देत, यावेळी पीएसएलचे सामने Closed doors पद्धतीने खेळवले जाणार आहेत. मोठ्या जल्लोषाचं आणि आकर्षणाची बाबत असलेली ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी थाटामाटात होणारा उद्घाटन सोहळा यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. अफगाणिस्तानकडूनही धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ अंतर्गत दहशतवादच नाही, तर अफगाणिस्तानकडून होणाऱ्या सीमावर्ती हल्ल्यांमुळेही खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.
यापूर्वी २००९ मध्ये श्रीलंकन संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक वर्षे बंद होते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे बोर्ड आपल्या खेळाडूंना परत बोलावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






