
धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! (Photo Credit - X)
राकेश चौहान हे नोव्हेंबर २०२५ मध्ये मर्चेंट नेव्हीच्या माध्यमातून व्हेनेझुएला येथे जहाजावर नोकरीसाठी गेले होते. ते आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना अवघ्या ६ महिन्यांचे एक लहान मूल आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना, अचानक कुटुंबियांना मुंबईतील शिपिंग कंपनीच्या कार्यालयातून एक फोन आला. राकेश हे जहाजावरून खाली पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या प्रकृतीची चिंताजनक माहिती देण्यात आली आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्या मृत्यूची बातमी धडकली. या बातमीमुळे संपूर्ण चौहान कुटुंब उद्ध्वस्त झाले.
४ जून रोजी राकेश यांचे पार्थिव देवरिया येथे आणण्यात आले. स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाची पाहणी केली असता, त्यावर आधीच शवविच्छेदन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासकीय आदेशाशिवाय पुन्हा शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा दंडाधिकारी यांनी विशेष आदेश जारी केले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदन अहवालाने वैद्यकीय क्षेत्रासह तपास यंत्रणांनाही हादरवून सोडले. राकेश यांच्या शरीराच्या आतील सर्वच्या सर्व मुख्य अवयव गायब होते.
‘फेडरेशन ऑफ सीफेरर्स युनियन ऑफ इंडिया’ (FSUI) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या डरावण्या सत्याला वाचा फोडली आहे. अहवालानुसार, राकेश यांच्या शरीरातून खालील अवयव काढण्यात आले होत. मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत, दोन्ही किडनी तसेच प्लीहा, स्वादुपिंड, जठर, आतडे, थायरॉईड, हायॉइड, लॅरिंक्स आणि ट्रॅकिया. तसेच मृतदेहावर मानेपासून खालपर्यंत २२ टाके आणि कानापासून कानापर्यंत २१ टाके मारलेले होते. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. मृतदेह सुमारे एक महिना डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. भारतीय नाविक परदेशात बळीचे बकरं बनत असल्याचा संताप व्यक्त करत FSUI ने या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे.
काही आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्या आणि मानवी अवयव तस्करांच्या टोळीने मिळून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने आता जिल्हा प्रशासन, उत्तर प्रदेश सरकार, नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालय आणि वेनेझुएला येथील भारतीय दूतावासाकडे न्यायाची गुहार लावली आहे. या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याचा छडा लावून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण देवरिया जिल्ह्यातून होत आहे.