
Asif Ali Zardari Hindu population statement
भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Conflict) यांच्यातील राजनैतिक संबंध आधीच कमालीच्या तणावातून जात असताना, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानामुळे नवीन आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील ‘यादगार-ए-फतेह’ विजय स्मारकात आयोजित एका औपचारिक सोहळ्यात बोलताना, झरदारी यांनी पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांविषयी बेताल वक्तव्य केले. “पाकिस्तान हा एक मुस्लिम बहुल देश असूनही, आम्ही देशातील ३ ते ४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करत आहोत,” असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांना देशावरील ओझे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
झरदारी यांच्या या वक्तव्यामुळे केवळ पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला नाही, तर संपूर्ण भारतातून या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. आपल्या भाषणात झरदारी यांनी भारताच्या ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा आवर्जून उल्लेख केला. “भारताचा स्वतःचा एक वेगळा राजकीय दृष्टिकोन आणि अजेंडा आहे. ते अखंड भारताचा विचार करतात. आम्ही मुस्लिम आहोत आणि ते हिंदू आहेत, पण आमची विचारसरणी अशी आहे की आम्ही ३-४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करत आहोत आणि ते पाकिस्तानात आनंदाने व स्वातंत्र्याने राहत आहेत,” असा दावा झरदारी यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
विशेष म्हणजे, आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख असूनही आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्येची अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली. पाकिस्तानच्या २०२३ च्या अधिकृत जनगणनेच्या (2023 Pakistan Census) माहितीनुसार, देशात हिंदूंची एकूण संख्या सुमारे ५२ लाख इतकी आहे, जी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २.१७ टक्के आहे. झरदारी यांनी सांगितलेला ३ ते ४ टक्क्यांचा आकडा वास्तविकतेपेक्षा खूप फुगवून सांगितलेला आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पाकिस्तानातील हिंदूंची संख्या सातत्याने घटत चालली असून, जबरदस्तीने होणारे धर्मांतर आणि अत्याचारामुळे अल्पसंख्याक समुदाय अत्यंत भीतीखाली जगत आहे.
झरदारी यांनी भाषणात पुढे असा दावा केला की, पाकिस्तानातील हिंदू नागरिक पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि ते भारतात जाण्याऐवजी पाकिस्तानात राहणेच पसंत करतील. मात्र, त्यांचे हे विधान वास्तविक परिस्थितीशी अत्यंत विसंगत असल्याचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या अहवालांवरून स्पष्ट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
झरदारी यांच्या या विधानानंतर भारतातून सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रातील तज्ज्ञांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. विद्वानांनी आणि विचारवंतांनी झरदारी यांच्या ‘सहिष्णुता’ किंवा ‘सहन करतो’ या शब्दाच्या वापरांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एखाद्या देशाच्या संविधानाने तेथील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असताना, राष्ट्रपती स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांसाठी ‘सहन करणे’ असा शब्दप्रयोग कसा करू शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लेखक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे संविधान कागदावर अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते, पण प्रत्यक्षात तिथे दररोज हिंदू आणि इतर अल्पसंख्याक मुलींचे अपहरण, सक्तीचे धर्मांतर, भेदभाव आणि टोळक्यांकडून होणाऱ्या हिंसेच्या (Mob Violence) घटना घडत आहेत.
प्रसिद्ध गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी देखील झरदारी यांच्या या विधानाचा अत्यंत खोचक शब्दांत समाचार घेतला. झरदारी यांच्यावर असलेल्या जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत, “झरदारी साहेबांना १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या कोणत्याही गोष्टीची कदर नसते, त्यामुळे ते ३-४ टक्के हिंदूंबद्दल असे बोलत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. पाकिस्तानच्या या बेताल वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानचा अल्पसंख्याकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. स्वतःच्या देशातील गरिबी, महागाई आणि राजकीय अस्थिरतेवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी नेते नेहमीच भारतविरोधी आणि हिंदूविरोधी वक्तव्ये करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.