Pakistan On Pahalgam Attack: आत्ता समोर आला पाकिस्तानचा खरा चेहरा; मंत्री इशाक दार यांनी पहलगाम दहशतवाद्यांना म्हटले 'स्वातंत्र्यसैनिक' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan On Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे अंत:करण हादरले असताना, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला दुहेरी आणि दुटप्पी चेहरा जगापुढे मांडला आहे. एकीकडे औपचारिक निषेध व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानने दुसरीकडे आपल्या परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ असे संबोधून जगाला धक्का दिला आहे.
या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादास पाठिंब्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. भारत सरकारने यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत सिंधू पाणी करार तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला, जो १९६० पासून भारत-पाक संबंधांमध्ये महत्त्वाचा दस्तऐवज मानला जात होता. या निर्णयानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केले असून, अटारी सीमा तातडीने बंद करण्याचे निर्देशही जारी केले आहेत.
इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यात म्हटले की, “हे लोक आमच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आहेत. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांचा आदर केला पाहिजे.” हे विधान केवळ भारतासाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही धक्कादायक ठरले आहे.
TRF (The Resistance Front) या लष्कर-ए-तैयबा संलग्न दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. TRF हीच ती संघटना आहे, जी ISI (Inter-Services Intelligence) कडून पाठिंबा मिळवत असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे इशाक दार यांचे विधान केवळ असंवेदनशीलच नाही, तर पाकिस्तानचा दहशतवादास पाठिंबा आणि दुटप्पी भूमिका उघड करणारे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा पाकिस्तानवर घणाघात; संबंध तुटण्याचा निर्णायक टप्पा, कूटनीतीचा नवा अध्याय सुरू
भारत सरकारने पाकिस्तानच्या या निर्लज्ज वर्तनानंतर त्वरित कडक पावले उचलली आहेत. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की, “आता संयम संपला आहे”. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानला पाणी देत असतानाच तो भारतावर हल्ले घडवून आणतो, हे अजिबात सहन केले जाणार नाही. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने (NSC) भारताच्या निर्णयाला युद्धसदृश कृती म्हणत, भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री दार म्हणाले, “२४ कोटी नागरिकांना पाणी हवे आहे, भारताने जर हे थांबवले तर आम्ही गप्प बसणार नाही.”
🚨SHOCKING: Pakistan’s Deputy Prime Minister referred to the terrorists who killed the tourists in Pahalgam as “freedom fighters.”
PAKISTAN IS A TERRORIST STATE. PERIOD. pic.twitter.com/dEiA69ji7B
— BALA (@erbmjha) April 24, 2025
credit : social media
या घटनेनंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी हाकलून दिले असून, दुतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संवाद पूर्णतः थांबवण्यात आले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीही भारताला खुलेआम धमकी दिली. ते म्हणाले, “जर भारत आमच्या नागरिकांना इजा पोहोचवेल, तर भारतीयही सुरक्षित राहणार नाहीत.” या प्रकारची थेट धमकी देणारी भाषा आंतरराष्ट्रीय कक्षेत अत्यंत गंभीर मानली जाते.
दहशतवादाविरोधात लढा देण्याचे नाटक करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता पुन्हा एकदा समोर आला आहे. इशाक दार यांच्या विधानामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांचा आश्रयदाता देश असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांकडे याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. जगभरातून या वक्तव्यावर टीका होत असून, अनेक देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेला समर्थन देण्यास नकार दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर न्यू यॉर्क टाईम्सचा वादग्रस्त अहवाल; अमेरिकन समितीकडून तीव्र प्रतिक्रिया
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका ही केवळ सुरक्षा धोरणातील बदल नाही, तर राष्ट्रहितासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवणारी आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणत स्वतःची जागतिक मंचावर नाचक्की करून घेतली असून, भारत आता शून्य सहनशीलतेच्या भूमिकेवर ठाम आहे.
“संवाद नाही, केवळ उत्तर!” – हेच भारताचे नवे धोरण असल्याचे या घडामोडींनी अधोरेखित केले आहे.