पुन्हा होणार 'Operation Sindoor 2.0'? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज; पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावरून परतताच घेणार आपत्कालीन CCS बैठक.
बैठकीत स्फोटाच्या तपासावर व भविष्यातील सुरक्षा रणनीतीवर उच्चस्तरीय चर्चा होणार.
“ऑपरेशन सिंदूर भाग-२” पुन्हा सुरू होण्याची शक्यता; पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत.
PM Modi CCS Meeting : राष्ट्रीय राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहे. सोमवारी( दि. 11 नोव्हेंबर 2025) झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर( Delhi Bomb Blast) देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भूतानच्या दौऱ्यावर असून, ते परतल्यानंतर स्वतः या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत स्फोटाच्या तपासाची सद्यस्थिती, सुरक्षा संस्थांचे अहवाल आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा अपेक्षित आहे.
या स्फोटाने देशाच्या राजधानीतील सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उभे केले आहेत. प्रारंभी हे स्थानिक अपघात असल्याचे वाटले, परंतु तपास पुढे सरकताच त्याचे धागेदोरे पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलकडे जात असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात “जैश-ए-मोहम्मद”शी संबंधित असलेल्या ‘शाहीन ग्रुप’ चा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच सरकार पुन्हा “ऑपरेशन सिंदूर भाग-२” ( Operation Sindoor 2.0) सुरु करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या CCS बैठकीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध “ऑपरेशन सिंदूर” चालवले होते. या अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर राजनैतिक आणि माहितीविषयक दबाव निर्माण करण्यात आला होता. सरकारने त्या वेळी स्पष्ट सांगितले होते की “हे ऑपरेशन संपलेले नाही” आणि भारतावर होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कारवाईला युद्ध समजले जाईल. त्यामुळे दिल्लीतील ताज्या स्फोटांनंतर पुन्हा एकदा त्याच ऑपरेशनचा पुढील टप्पा सुरु होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात चर्चिली जात आहे.
हे देखील वाचा : World Pneumonia Day : एक श्वास… अनेक धोके! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात चिंता वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच विधान केले की, “देश सध्या युद्धात आहे.” त्यांचे हे विधान जरी इस्लामाबाद न्यायालय संकुलातील आत्मघाती स्फोटाच्या संदर्भात केलेले असले, तरी भारताशी वाढत्या तणावाची पार्श्वभूमी स्पष्ट जाणवते.
याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर या हल्ल्यांसाठी थेट आरोप ठेवले. मात्र भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटले की,
“भारताचा कोणत्याही दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानमधील लष्कर-प्रेरित अराजकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरुद्ध खोटे कथानक रचले जात आहे.”
दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर आणि जम्मू-कश्मीरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा संस्थांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून स्फोटात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि विस्फोटकाच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास सुरु आहे.
हे देखील वाचा : भारतीय डॉक्टर अन् नर्सला जगातिक स्तरावरुन मागणी! तरी देशातील आरोग्य सेवेचे मोडले कंबरडे
या पार्श्वभूमीवर मोदी सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे. एकीकडे शांततापूर्ण संवादाचा मार्ग खुला ठेवायचा आहे, तर दुसरीकडे देशाच्या सार्वभौम सुरक्षेशी तडजोडही करता येणार नाही. त्यामुळे “ऑपरेशन सिंदूर २.०” हा केवळ लष्करी प्रतिसाद न राहता, भारताच्या राजनैतिक सामर्थ्याचा नवा अध्याय ठरू शकतो. भविष्यातील दिशा ठरवणारी ही CCS बैठक म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक क्षण ठरू शकते. आता संपूर्ण देशाचे डोळे पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर खिळले आहेत.






