नवी दिल्ली : बिहारमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या जदयू आणि राजद या महाआघाडीची साथ 100 टक्के तुटेल, असा दावा भाजपचा प्रमुख मित्र असलेल्या ‘लोक जनशक्ती पार्टी’चे नेते आणि केंद्रीयमंत्री पशुपती कुमार पारस यांनी शनिवारी केला. तसेच अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी (एनडीए) ‘गुड न्यूज’ असेल, असेही ते म्हणाले.
पारस पुढे म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यातील मतभेद अधिक गडद झाले आहेत. हिंदू मान्यतेत अशुभ मानला जाणारा काळ ‘खरमास’ संपला आहे. 22 जानेवारीला अयोध्येत रामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.
एक शुभ काळ सुरू होणार असून, जे काही होईल ते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी चांगले असेल. बिहारसह संपूर्ण देश राम मंदिराबाबत उत्साहात बुडाला असून, विरोधकांना निवडणुकीत विजयाची कोणतीही शक्यता नाही, असा दावाही त्यांनी केला.






