बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापणार; महाविकास आघाडीत फूट पडणार? आता अंतिम निर्णय... (File Photo)
मुंबई : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली असून, महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारामती आणि राहुरी संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज आले असून, बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या असून, येत्या दोन दिवसांत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे. अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी हे मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे होते. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार न देण्याची शक्यता असताना काँग्रेसने लढण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत आहेत.
राहुरी मतदारसंघ देखील शरद पवार गटाकडे असल्याने तेथे पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याने महाविकास आघाडीत मतभेद तीव्र होत असून, आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.
अंतिम निर्णय एकत्र बसूनच
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, उमेदवारीबाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करूनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राहुरीत शरद पवार गटाची ताकद
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर परिस्थिती वेगळी असून, कौटुंबिक परंपरेचा विचार करून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्या ठिकाणी इतर कोणी उमेदवार उभा राहिल्यास त्याला विरोध करू नये, असेही त्यांनी म्हटले.
राहुरी मतदारसंघाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद आहे. त्यामुळे त्या पक्षालाच प्राधान्य देणे महाविकास आघाडीच्या धोरणानुसार योग्य ठरेल. दरम्यान, या दोन्ही जागांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते लवकरच बैठक घेणार असून, भाजपला फायदा होईल अशी कोणतीही भूमिका टाळण्यावर भर दिला जाणार आहे.
मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक






