
भारतातील शहरांमध्ये आणि गावांमध्ये सकाळी उठल्याबरोबर एका विशिष्ट घंटेचा आवाज आपल्या कानावर पडतो, तो म्हणजे कचरा गोळा करणाऱ्या ‘घंटागाडीचा’. आज ही घंटागाडी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. वाहन उद्योगाचा अजून एक उत्तम नमुना म्हणून या घंटागाडीकडे पहिले जाऊ शकते. ऑटोमोबाईल सार्वजनिक स्वच्छतेच्या क्षेत्रातील हा एक अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण बदल मानला जातो.
घंटागाडीचा शोध आणि सुरुवात
घंटागाडीच्या या संकल्पनेचा उगम आणि पहिली यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्रातील नाशिक महानगरपालिकेने केली. नाशिक हे घंटागाडीचे ‘जनक’ मानले जाते. १९९० च्या दशकात नाशिक शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत असत, ज्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरत असे. या समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन प्रशासनाने आणि स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी मिळून ‘घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची’ एक अनोखी योजना आखली. सुरुवातीला लहान हातगाड्या आणि नंतर वाहनांच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू झाला. नाशिकचा हा ‘कचरामुक्त शहर पॅटर्न’ एवढा यशस्वी ठरला की, पुढे संपूर्ण देशाने ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ हा पॅटर्न स्वीकारला.
Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय
‘घंटागाडी‘ नावामागची रंजक गोष्ट
या गाडीला ‘घंटागाडी’ हे नाव मिळण्यामागे एक अतिशय व्यावहारिक आणि इंटरेस्टिंग कारण आहे. सुरुवातीच्या काळात आजच्यासारखे आधुनिक लाऊडस्पीकर किंवा गाणी लावणारी डिजिटल सिस्टीम नव्हती. तसेच, कचरा वेचणारे कर्मचारी गल्लोगल्ली आल्यानंतर प्रत्येक घराचे दार वाजवून कचरा गोळा करणे शक्य नव्हते. लोक घरात व्यस्त असायचे आणि गाडी येऊन निघून गेल्यावर पुन्हा रस्त्यावर कचरा फेकला जायचा.
यावर उपाय म्हणून, कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर किंवा कर्मचाऱ्यांच्या हातातील गाडीला शाळेच्या घंटेसारखी एक मोठी लोखंडी किंवा तांब्याची ‘घंटा’ बांधण्यात आली. गाडी गल्लीत आली की कर्मचारी ती घंटा जोरात वाजवायचे. घंटेचा तो आवाज ऐकून नागरिकांना समजायचे की कचरा घेणारी गाडी आली आहे. मग लोक घरातील कचरा घेऊन बाहेर येत असत. घंटेच्या या आवाजामुळे लोक गाडीची वाट पाहत उभे राहू लागले आणि रस्त्यावरील कचराकुंड्या हळूहळू गायब झाल्या. घंटेच्या या अफलातून वापरामुळे जनतेनेच या गाडीचे नाव अगदी आपुलकीनेचं ‘घंटागाडी’ असे ठेवले.
Nashik Farmers : शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया
आज तंत्रज्ञान बदललेले असून घंटेची जागा देशभक्तीपर, स्वच्छतेच्या गाण्यांनी घेतली असली, तरीही लोकांच्या मनात या गाडीचे ‘घंटागाडी’ हेच नाव कायम टिकून आहे. नाशिकमध्ये सुरु झालेल्या या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घंटागाडीचा डंका आज संपूर्ण भारतात ‘स्वच्छ भारत अभियान’ मधूनही वाजत आहे.