कोकणातल्या दिवेआगरपासून जंजिर्यापर्यंतचा मार्ग आमच्यासाठी नवीन होता. या ऐतिहासिक अशा स्थळाला पर्यटक आवर्जून भेट देतात आणि समुद्री प्रवासाचा आनंद लुटतात. तसे बघितले तर मुरुड, दंडा राजपुरी आणि दिघी येथूनसुद्धा जंजिर्याला जाता येते. दिवेआगरपासून केवळ १६ किलोमीटरवर असलेले ‘दिघी’ हे नैसर्गिक गाव आणि या गावात असलेली समुद्रावरची ‘जेट्टी’ म्हणजे फेरीबोटचे पाण्यातले रमणीय स्टेशनच. येथून सुरू होतो शानदार ‘दिघी क्वीन’ या बोटीमधून जंजिर्याचा एका तासाचा निळ्याशार पाण्यातला विलोभनीय समुद्री प्रवास. या जेट्टीवर ‘दर्शन लाँच’ व फेरीबोटची सेवा आगरदांडा गावात वाहने नेण्याकरिता सतत उपलब्ध असते. हा परिसर अत्यंत स्वच्छ असून फारशी गर्दी या मार्गावर नसतेच. त्यामुळे अतिशय शांतपणे मनसोक्त समुद्र पर्यटनाचा आनंद दिघीपासून घेता येतो. जवळपास एका तासात आम्हाला मजबूत असा अंगदासारखा पाय रोवून बसलेला काळाकभिन्न जंजिरा दुरून दिसायला लागला. विलोभनीय बुरूजांचे दर्शन झाले. शिडाच्या लहान होड्यांमधून किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि भव्य अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. येथे दिसायला लागला समुद्रातला एक अज्ञात प्राचीन इतिहास.
सहजच मनात विचार आला समुद्रातल्या या २२ एकरच्या बेटावर हा अभेद्य किल्ला कसा बांधला असेल? इथल्या पायरीच्या प्रत्येक दगडाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा दडलेल्या आहेत.उद्ध्वस्त कमानी आपल्या शौर्याच्या गाथा सांगत आहे. जीर्ण झालेला पडित महाल आपल्या कर्मावर आसवे गाळीत आहे. तरीही कलाल बांगडी, लांडाकासम, चावरी या तोफा आपल्या किल्ल्याचा प्राचीन इतिहास सांगायला आसुसलेल्या असतात.
जंजिरा हा शब्द ‘जझीरा’ या अरबी भाषेतून आलेला आहे. याचा अर्थ ‘बेट’ अथवा समुद्रावरचे ‘बंदर’असा आहे. समुद्रावरच्या या खुल्या बेटाजवळ असलेल्या ‘राजपूर’ या गावाला कोळ्यांची मोठी वस्ती होती. साहजिकच मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. परंतु, त्या काळात समुद्रीचाचे म्हणजे लुटारूंच्या टोळ्या कोळी समाजाला या खुल्या बेटावरून खूप त्रास द्यायचा. त्यांचा उपद्रव व्हायचा व आक्रमण करून माल लुटून न्यायचे. या चाच्यांना प्रतिबंध करण्याकरिता अहमदनगर सल्तनतच्या निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घेऊन राजा रामराव पाटील या राजपूरच्या कोळ्याच्या नायकाने या बेटावर लाकडी ओंडक्यांची तटबंदी सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात उभारली. या लाकडी तटबंदीला मेढेकोट म्हणत. या कोळ्यांच्या राजा रामराव पाटलाला ‘जंजिर्याचा राजा’ म्हणायचे. मग हे पुर्णपणे सुरक्षित बेट ताब्यात आल्यानंतर हा राम पाटील त्या ठाणेदाराला जुमेनासा झाला. राम पाटलाचा बंदोबस्त करण्याकरिता मग पिरमखान याची नियुक्ती ठाणेदाराने केली. संधीसाधून पिरमखानने या बेटावर आक्रमण केले आणि हे जंजिरा बेट ताब्यात घेतले. राम पाटलासह रात्रीच्या भयाण अंधारात या समुद्री बेटावर सर्वांची कत्तल केली आणि मेढेकोट आपल्या ताब्यात घेतले. पिरमखानची कारकीर्द १५२६ ते १५३२ पर्यंत होती आणि तो १५३२ला मरण पावला. कालांतराने बुरहाणखानची नियुक्ती झाली. पण लाकडी मेढेकोट पाण्याने झिजत असल्याचे बघून मजबूत दगडी कोट बांधण्याची परवानगी बुरहानखानने निजामाकडुन मिळवली. १५६७ ते १५७१ ला हा आताचा दगडी कोट बांधला, याला किल्ले मेहरुब म्हणायचे. १६१७ ला सिद्दीचे भारतात आगमन झाले. शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ला झालेला आहे. आताचे जे संपूर्ण दगडी कोटाचे बांधकाम आपल्याला दिसते ते बुरहानखानने बांधलेले आहे. या जंजिर्यावर मग इ.स. १६१७ पासून सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थांचा मूळ पुरुष समजल्या जातो. सिद्दी हा समाज भारतातला नाही तर आफ्रिकेतल्या ॲबिसीनिया प्रांतातला असून हे लोक शरीराने दणकट मजबूत, काटक आणि शूर दर्यावर्दी होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा बुलंद जंजिरा किल्ला लढवून ३३० वर्षापर्यंत अजिंक्य ठेवला. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मिळून हा जंजिरा जिंकण्याकरिता येथून चार किलोमीटरवर समुद्रातच ‘पद्मदुर्ग’ (कासा फोर्ट) हा किल्ला बांधला; पण जंजिरा जिंकता आला नाही. या भिंतीची ऊंची ४० फुटांपेक्षा जास्त असून याला १९ कमानी आहेत. बरेचवेळा कमानीतून वाकून जावे लागते. या किल्ल्याच्या आतमध्ये अनेक उद्ध्वस्त जर्जर झालेल्या अनेक इमारती, मशिदी, राजवाडा, राण्यांचे स्नानगृह, पाणीपुरवठा करणारे प्राचीन स्त्रोत, गोड पाण्याची विहीर, दोन मोठे षटकोनी तलाव, चार मोठे हौद, ‘सदर’ या लहान किल्ल्यावरचा तिरंगा हे सर्व बघायला मिळते. प्रवेश द्वाराजवळच एका वाघाने पाच हत्तींना पायाखाली चिरडल्याचे पराक्रमी इशारा देणारे दगडी शिल्प, पहारेकर्यांची देवडी, घोड्यांच्या पागा, जहाज नांगर, पीर पंचायतन आणि सुरूलखानचा श्रीमंती भोगलेला उघड्या खिडक्या असलेला तीन मजली उद्ध्वस्त पडका वाडा बघायला मिळतो. शहा बाबाचा मकबरासुद्धा येथे बघायला मिळतो. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या किल्ल्यांवर एकूण २१ सिद्दींनी राज्य केले आणि १६१७ ते १९४७ पर्यंत म्हणजे ३३० वर्षे हा बुलंद किल्ला अभेद्य ठेवला. आज या किल्ल्याला ४०४ वर्षे पूर्ण होत आहेत.
समुद्रसपाटीपासून ९० फुट उंच व २० फुट खोल पाया असलेला हा किल्ला बांधायला सिद्दीला संपूर्ण २२ वर्षे लागली आणि संरक्षणाकरिता बावीस एकरात ५१४ बुरुजांसह २२ सुरक्षा चौक्या उभारल्या व या आताही बघायला मिळतात. ब्रिटिश, पोर्तुगाल, इंग्रज, मुघल, मराठा आणि अनेकांना हा किल्ला कधीच जिंकता आला नाही हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. राजा रामराव पाटील हा जंजिर्याचा ‘पहिला राजा’ तर ‘सिद्दी अंबर’ हा पहिला सिद्दी वंशजांचा मूळ पुरुष. भारतीय गणराज्यात जंजिरा संस्थान विलीन होत असताना शेवटचा म्हणजे एकविसावा सिद्दी होता ‘मुहम्मदखान’. सिद्दी वंशजांनी हा बुलंद ‘जंजिरा जलदुर्ग’ शेवटपर्यंत अजिंक्य व अभेद्य ठेवला. एकेका अज्ञात स्थळांचा कसकसा इतिहास असतो हे बघून मन सुन्न झाले. असा हा समुद्रातला अजेय जलदुर्ग ..! २१ सिद्दींचा बुलंद जंजिरा..!
-श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com






