“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी; जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” मायमातीचं म्हणजे महाराष्ट्राच्या या मराठीचं हे अभिमान गीत. सुरेश भटांनी लिहिलेल्या या ओळी वाचल्या किंवा ऐकल्या जरी तरीदेखील प्रत्येकाचा उर अभिमानाने भरतो. महाराष्ट्राच्या स्वतंत्र्यतेसाठी अनेक क्रांतीकारकांनी जसं वीरमरण पत्कारलं तसंच ही मायमातीची भाषा टीकावी, वाढावी आणि जोपासली जावी यासाठी आजतागायत अनेकजण जीवाचं रान करत आहेत. आज मराठी भाषा ही अभिजात मराठी भाषा म्हणून ओळखली जाते. पण या तुमच्या आमच्या या मायमातीच्या भाषेचा आजपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहित आहे का ?
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो हे सर्वांनाच माहित आहे. असं म्हटलं जातं की मैला-मैलांवर मराठी भाषेची रुपं बदलली जातात. पण या भाषेचं नक्की मुळ कुठलं? मराठी जन्माला आली तरी कशी ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही इतिहासात आढळतात.
मराठीचं मुळ कोणतं ?
मराठी भाषेची पाळंमुळं शोधायची झाली तर ती बहुतांश आर्यसंस्कृतीत पहायला मिळतात. ही भाषा इंडो आर्य भाषा कुटुंबातील आहे. तिची उत्पत्ती ही महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये आणि अपभ्रंशमध्ये झाले. इतिहासाचा अभ्यास करायचा झाला, तर साधारणत:1500 वर्षापूर्वी या प्राकृतचे बोलीभाषेत रुपांतर झाले. पुढे पुढे काळ जसा सरकत गेला तसं 10 व्या आणि 13 व्या शतकाच्या दरम्यान या भाषेची जुनी मराठी म्हणजेच पुर्वीच्या काळी बोलली जात असलेल्या मराठीत तिचं रुपांतर झालं. या भाषेचा मुलभूूत आधार म्हणजे प्राकृत आणि त्यानंतरची अपभ्रंश होणारी भाषा.
यानंतर येतो तो सातवाहनांचा काळ. या काळात मराठी भाषेला प्रमुख भाषा मानली जाऊ लागली. हा काळ म्हणजे साधारणत: इ.स. पूर्व दुसर्या शतकात या भाषेचा संवाद साधण्यासाठी वापर वाढला. आणि हाच तो काळ होता ज्यावेळी प्राकृत भाषेचं रुपांतर मराठीत होऊ लागलं होतं. याबाबतचे प्राचीन पुरावे 739 सी ईच्या साताऱ्यातील ताम्रपटात मिळतात. या 10 व्या आणि 11 शतकातील शिलालेखात देखील मराठीचा उल्लेख आढळतो. याच्या पुढे ही भाषा इतकी प्रवाहीत होत गेली की, साहित्यात देखील तिने आपलं अस्तित्व निर्माण केलं. खरंतर मराठीच्या साहित्याचा विकास हा ‘निळाचरित्र’ ग्रंथाने झाला. त्याननंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ मराठीचा सर्वांगीण होत जाण्यास कारण ठरली.
सुरुवातीच्या काळात मोडी लिपीचा वापर केला जात असे पण काळाच्या प्रवाहात देवनागरी भाषेचा वापर होत गेला. थोडक्यात सांगायचं झालं तर प्राकृत भाषा, अपभ्रंश, जुनी मराठी आणि आधुनिक मराठी असा हा एकंदरीतच मराठी भाषेचा प्रवास आहे.आज मराठी राजभाषा, अभिजात भाषा म्हणून गौरविण्यात येते. साहित्याचा विचार करायचा झालाच तर, विनोदी, अध्यात्म, शौर्यकथा प्रबोधन,लोककथा, लोकगीत हे मराठीचे महत्वाचे अंग आहे. ज्या छत्रपती शिवरायांच्या मुखी रेंगाळलेली ही भाषा फक्त तुमच्या आमच्या रोजच्या संवादातील नाही तर अभिमाने जगात मिरवण्याची भाषा आहे. ज्या भाषेने ज्ञान दिलं, वितार करण्याची क्षमता दिली ती जोपासणं हे प्रत्येक मराठी भाषिकाचं कर्तव्य आहे.






