आपण लहान असताना काही गोष्टींचं महत्त्व आपल्याला समजत नाही. मात्र जसजसं आपण मोठं होत जातो, तसतशी आपल्याला समज यायला लागते. मी दहावी-बारावीत आल्यावर मला जाणीव होत गेली की, आई किती वेगळं आयुष्य जगली आणि कितीतरी लोकांचंही आयुष्य तिनं समृद्ध केलं.
आईचं विवाहापूर्वीचं आयुष्य हे पूर्णतः वेगळं होतं. तिचा जन्म नागपुरातील एका रुढीवादी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई-वडील दोघंही शिक्षक होते. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच १९७२ साली आई-बाबांचा प्रेमविवाह झाला. विवाहानंतर बाबांच्या प्रेमाखातर आईनं आपलं संपूर्ण आयुष्य दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील जंगलात घालवलं, ही फार मोठी गोष्ट आहे.
यापूर्वी तिनं कधी असं जंगलही बघितलं नव्हतं. फक्त बाबांवर दृढ विश्वास ठेवून तिनं आपलं आयुष्य झोकून दिलं. ज्यावेळी या ठिकाणी कामाला सुरुवात केली, त्यावेळी इथे काहीही नव्हतं. ही एकटी बाई शिकलेली होती आणि पुरुष कार्यकर्ते सोबत होते. या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत एक कुटुंबच आईनं इथे निर्माण केलं.
त्याकाळी वीज, रस्ते हे काहीही नसताना स्वतः झोपडी बांधण्यापासून आई-बाबांनी सर्वकाही केलं. जवळजवळ पहिली २२ वर्षं इथे वीज नव्हती तर सुरुवातीची १०-१२ वर्षं राहायला पक्कं घर नव्हतं. अशा परिस्थितीत बाबांची साथ देत आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून या लोकांना आरोग्यसुविधा देणं, त्यांना जीवदान देणं हे व्रत आईने अंगिकारलं, जे मुळीच सोप्पं नव्हतं. माझ्या बाबांना आजोबांकडून हा वारसा होता. महारोग्यांच्या सान्निध्यात बाबांचं आणि काकांचं बालपण गेलं होतं. पण आईचं मात्र तसं नव्हतं, त्यामुळे आईचं जास्त कौतुक आहे.
बाबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आलेले अनेक कार्यकर्ते आणि त्यांची कुटुंबही आई-बाबांच्या साथीला होती. ही सर्व विविध क्षेत्रातील, काही उच्चशिक्षित तसेच वेगवेगळ्या विचारधारेची लोकं होती आणि अजूनही आहेत. पण या गोष्टीचा कोणताही परिणाम लोकबिरादरीच्या प्रकल्पावर होऊ न देता सगळ्या कार्यकर्त्यांना सातत्याने एकजुटीने एका ठिकाणी ठेवणं, हे काम आईनं केलं. इतकी वर्षं आई-बाबांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यकर्त्यांनी जो हातभार लावला त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्प खूप मोठा आणि यशस्वी होत गेला.
आईची कामाची पद्धत, तिचं सर्व लोकांशी वागणं पाहता, मी डॉक्टर आहे म्हणून तिनं कधीच मिरवलं नाही की, मी काहीतरी मोठा त्याग केलाय किंवा खूप मोठं काम केलंय म्हणून दिमाख दाखवला नाही. कारण हा त्याग तिच्या आतून आला होता. आई जेव्हा बाबांबरोबर इकडे आली तेव्हा त्यांच्याबरोबरीचे डॉक्टर झालेले काही मित्र परदेशात जाणार होते, काहीजणांनी नागपुरात प्रॅक्टिस सुरू केली, तर काहींनी सरकारी नोकऱ्या स्वीकारल्या होत्या. आई मात्र बाबांनी निवडलेल्या वेगळ्या वाटेवर चालली. त्यावेळी अनेकांनी तिला विरोध केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. आई-बाबांनी घेतलेल्या या निर्णयावर सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलं होतं. पण आज लोकांना कळतंय की काहीतरी वेगळं जग आई-बाबांनी घडवलं आहे.
खरं तर आईचा त्यागच खूप महत्त्वाचा आहे. याविषयी एक सांगायचं म्हणजे, जेव्हा तिने आम्हाला लोकबिरादरीच्या शाळेमध्ये शिकविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या मनावर खूप दडपण होतं. कारण या शाळेत शंभर टक्के आदिवासी समाजातील मुलं होती. त्यांची आकलनशक्ती खूप कमी असल्यामुळे त्यांना खूप हळूहळू शिकवावं लागे. त्यावेळी आपण आपल्या मुलांवर अन्याय तर करीत नाही ना, या विचाराने आई म्हणून तिच्या मनाची झालेली घालमेल, मनात आलेला अपराधीपणा या गोष्टी आम्ही बघितल्या होत्या. परंतु इथेच त्यांच्या पध्दतीने त्यांच्याबरोबरच सातवीपर्यंत तिने आम्हाला शिक्षण दिलं.
त्याचा एक फायदा म्हणजे निसर्ग अनुभवत तसेच वन्य आणि इतर प्राण्यांबरोबर खेळत खेळत मला शिकता आलं. शहरातील शाळेत शिकायला गेलो असतो तर या गोष्टी मला कधीच मिळाल्या नसत्या. त्यामुळे आम्हाला समजायला लागल्यावर जाणवलं की किती चांगल्या कुटुंबात आम्ही वाढलो… घडलो… जगलो. आईनं आम्हाला इथेच शिकविलं. त्यामुळे इतरांपेक्षा कितीतरी वेगळं, सुंदर बालपण आम्हाला लाभलं, जे प्रत्येकालाच मिळत नाही.
साधनाताई आमटे म्हणजे माझ्या आजीचाही आईवर प्रचंड विश्वास होता. प्रेम होतं. कारण आजोबांनी महारोग्यांसाठी काम करताना ज्या हालअपेष्टा सोसल्या, त्यापेक्षाही जास्त हालअपेष्टा आई-बाबांनी सोसल्या, हे आजी-आजोबांनी पाहिलं होतं. मात्र भौतिक सुखाविषयी आईनं कधींही तक्रार केली नाही. आजीनं लिहिलेल्या ‘समिधा’ या पुस्तकात आईविषयी ‘माझी गुरू कोण तर मंदा’ असा उल्लेखही आजीने केलाय. ‘‘माझ्या सुनेचं काम किती वेगळं आहे,’’ असं कौतुक तिनं या पुस्तकात केलं आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये बाबांना कर्करोगासारख्या भयंकर व्याधीला सामोरं जावं लागलं. मात्र या परिस्थितीतही आई बिलकुल डगमगली नाही, की देवालाही तिनं कधी मधे आणलं नाही. उपचाराचे मधले काही दिवस फार कठीण होते, पण आई तग धरून राहिली. एका खोलीतले ते दिवस त्या दोघांनीच अनुभवले. कारण त्यावेळी आम्ही तेथे नव्हतो. अतिशय जिद्द दाखवत सतत बाबांना सकारात्मक ठेवण्याचा तिने प्रयत्न केला, याचं बाबांनाही खूप कौतुक वाटलं आणि आम्हालाही…
अनघा सावंत
anaghasawant30@rediffmail.com






