
LPG संकट टळणार! युद्धाच्या धामधुमीत भारताला मोठा दिलासा (Photo Credit- X)
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केला होता. जगभरातील तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी हा मार्ग जीवनवाहिनी मानला जातो. हा मार्ग बंद झाल्याने भारताची गॅसने भरलेली जहाजे तिथेच अडकली होती. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा’ या दोन भारतीय जहाजांना तिथून बाहेर पडण्याची विशेष परवानगी देण्यात आली.
#WATCH | Gujarat: LPG tanker Shivalik, which crossed the Strait of Hormuz, arrives at the Mundra Port. pic.twitter.com/Az1Mk8E8T6 — ANI (@ANI) March 16, 2026
युद्धजन्य परिस्थितीमध्येही भारताचे ‘शिवालिक’ हे जहाज 54 हजार टन एलपीजी साठा घेऊन गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचले आहे. हे जहाज आल्याने गॅस वितरणातील अडथळे दूर होतील. तसेच, ‘नंदा’ हे दुसरे जहाजही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन मोठ्या खेपांमुळे देशातील एलपीजीचा तुटवडा दूर होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल.
Indian Currency: Iran युद्धाची रुपयाला झळ, Dollar समोर भारतीय चलन का पडतंय कमकुवत?
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये गॅसची तीव्र टंचाई जाणवत होती. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी तर सिलेंडर मिळवण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत होती. गॅसच्या कमतरतेमुळे अनेक हॉटेल आणि खानावळी बंद ठेवण्याची वेळ आली होती. काही शहरांमध्ये गॅस वितरणादरम्यान वादाचे आणि हाणामारीचे प्रकार घडल्याने, गॅस गोदामांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर हा नवीन साठा उपलब्ध होणे ही सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे, सागरी मार्ग पूर्णपणे बंद आहे. मोठ्या संख्येने जहाजे अजूनही समुद्रातच अडकून पडली आहेत. तथापि, इराणने भारताचा जाहीरपणे ‘मित्र’ म्हणून उल्लेख केला आहे. अलीकडेच, जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देताना, इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी म्हटले, “मला खात्री आहे की इराण आणि भारत हे मित्र आहेत आणि आमचे हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत.” याव्यतिरिक्त, इराणने असे स्पष्ट केले की भारत हा एक मित्र देश आहे आणि त्याच्याप्रती सदैव मैत्रीपूर्ण दृष्टिकोनच स्वीकारला जाईल. याच पार्श्वभूमीवर, त्या जहाजांना निघून जाण्याची परवानगी देण्यात आली.