Maharashtra Chemical Park
आगामी धोरणामुळे महाराष्ट्राच्या मजबूत रासायनिक उत्पादन आधाराला अधिक बळकटी मिळेल आणि या क्षेत्रासाठी जागतिक केंद्र (ग्लोबल हब) म्हणून राज्याचे स्थान भक्कम होईल. यातून स्पेशॅलिटी केमिकल्स, प्रगत साहित्य, बॅटरी मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक केमिकल्स, प्रगत पॉलिमर्स, बायोप्लास्टिक्स आणि इतर उच्च-मूल्य असणाऱ्या विभागांमध्ये गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन (आयएएस) यांनी ‘ॲसोचॅम महाकेम २०२६’ मध्ये बोलताना सांगितले की, राज्य सरकार स्वतंत्र धोरण, नवीन केमिकल पार्क्स आणि नवोपक्रम व तंत्रज्ञान-आधारित वाढीला पाठबळ देणाऱ्या उपायांच्या माध्यमातून रासायनिक क्षेत्रासाठी अधिक मजबूत परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करत आहे.
“महाराष्ट्र स्वतंत्र रासायनिक क्षेत्र धोरणावर काम करत असून, ऑक्टोबरअखेर ते लागू होईल अशी आमची अपेक्षा आहे. हे धोरण या क्षेत्राच्या विशिष्ट गरजा पूर्ण करेल आणि बायोप्लास्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोमॅन्युफॅक्चरिंग व इतर नवीन क्षेत्रांमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना पूरक ठरेल,” असे डॉ. अनबलगन यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार पालघर, रायगड आणि रत्नागिरी यांसारख्या ठिकाणी २,५०० ते ५,० हजार एकरच्या केमिकल पार्क्ससाठी जागेची पाहणी करत आहे. यासोबतच जलद मंजुरी आणि ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभता) या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य असेल. प्रस्तावित ₹१,००० कोटींचा महाराष्ट्र उद्योग व गुंतवणूक निधी संशोधन, तांत्रिक सज्जता आणि नवोपक्रमाला मदत करेल, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायांसाठी वित्तीय परिसंस्था मजबूत होईल.
मा. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण परदेशी (आयएएस) यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात रासायनिक आणि फार्मास्युटिकल क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल. या क्षेत्राची स्पर्धात्मकता ही मूलभूत सुविधा, ऊर्जा व पाण्याची उपलब्धता आणि सहाय्यक धोरणात्मक सुधारणांवर अवलंबून असेल. “हे साध्य करण्यासाठी जलद विकास आणि अधिक खाजगी गुंतवणूक आकर्षित करणारी परिसंस्था आवश्यक आहे. रसायने आणि औषधनिर्मितीसारख्या धोरणात्मक क्षेत्रांसाठी परवडणारा वीज-पाणी पुरवठा, लवचिक ऊर्जा उपलब्धता, शाश्वत जल व्यवस्थापन आणि पूरक धोरणात्मक सुधारणा महाराष्ट्राची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.”
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ॲसोचॅमद्वारे संदेश दिला की, राज्य सरकार या क्षेत्रात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि ‘मैत्री’ सिंगल-विंडो प्लॅटफॉर्म, जलद मंजुरी व धोरणात्मक प्रोत्साहनांच्या माध्यमातून व्यावसायिक वातावरण अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे. “आम्ही उद्योजकांना त्यांच्या पुढील मोठ्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचे आवाहन करतो. सिंगल-विंडो ‘मैत्री’ प्लॅटफॉर्म, जलद परवानग्या आणि मजबूत धोरणात्मक प्रोत्साहनांच्या माध्यमातून व्यवसाय-स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. लवकरच या क्षेत्रासाठी विशेष धोरण घोषित केले जाईल, ज्यामुळे गुंतवणूक आकर्षित करण्यास आणि विकासाला गती देण्यास मदत होईल.”
केमिकल आणि पेट्रोकेमिकल क्षेत्र हे महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाचे मुख्य इंजिन असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवोपक्रम-संचालित आणि शाश्वत औद्योगिक भविष्य घडवण्यासाठी सरकार आर्थिक, लॉजिस्टिक आणि प्रशासकीय पाठबळ देत राहील.
‘महाकेम २०२६’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र: फ्युएलिंग इंडियाज ट्रिलियन-डॉलर केमिकल व्हिजन’ या ॲसोचॅम-ईवाय अहवालानुसार, महाराष्ट्रातील रासायनिक क्षेत्राचे मूल्य सुमारे २२ अब्ज डॉलर असून, त्यात ३,६०० हून अधिक कारखाने आणि १३ घोषित केमिकल झोन आहेत. हे क्षेत्र भारताच्या एकूण केमिकल जीव्हीएमध्ये सुमारे १९ टक्के आणि देशाच्या केमिकल निर्यातीत १७ टक्के योगदान देते. तसेच महाराष्ट्राच्या एकूण औद्योगिक उत्पादनात याचा वाटा १३.५ टक्के असून यामुळे सुमारे ३ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
या अहवालात महाराष्ट्रासाठी व्हॅल्यू चेनमध्ये पुढे जाण्याच्या आणि स्पेशॅलिटी केमिकल्स, बॅटरी मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक केमिकल्स, प्रगत पॉलिमर्स, स्पेशॅलिटी कोटिंग्स, फार्मा व ॲग्रोकेमिकल मध्यस्थ उत्पादने (इंटरमीडिएट), बायोप्लास्टिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.ॲसोचॅम महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष श्री. मिलिंद हार्दीकर म्हणाले की, हे क्षेत्र एका निर्णायक वळणावर असून, विकासाच्या पुढील टप्प्यात केवळ उत्पादन क्षमता वाढवण्यापलीकडे जाऊन स्पेशॅलिटी केमिकल्स, उच्च-मूल्य डेरिव्हेटिव्ह्ज आणि शाश्वत ग्रीन केमिस्ट्रीकडे वळावे लागेल.
“हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आता मुद्दा फक्त क्षमता विस्ताराचा नाही, तर स्पेशॅलिटी केमिकल्स, उच्च-मूल्य डेरिव्हेटिव्ह्ज आणि शाश्वत ग्रीन केमिस्ट्रीकडे होणाऱ्या रचनात्मक बदलाचा आहे. आपल्याला पुरवठा साखळीची मजबूती, कच्च्या मालाची सुरक्षितता आणि शाश्वत उत्पादन यांच्यासह विकासाचा समतोल साधावा लागेल आणि यासाठी उद्योग व सरकारने एकत्र काम करणे आवश्यक आहे.”
कॅटॅलायझिंग इन्व्हेस्टमेंट्स, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, गुंतवणूकदार, संशोधक आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या रासायनिक क्षेत्राच्या पुढील टप्प्यावर चर्चा केली. यामध्ये गुंतवणुकीच्या संधी, नवोपक्रम आणि शाश्वत उत्पादन, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, मानकीकरण आणि प्रमाणीकरण, तसेच नवीन केमिकल तंत्रज्ञान संकल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत आणणे या विषयांवर सखोल विचारमंथन झाले.
महाराष्ट्राला पुढील पिढीच्या रासायनिक उत्पादनासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी धोरण, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, संशोधन आणि उद्योग यांच्यात अधिक समन्वय असण्याची गरज या परिषदेत व्यक्त करण्यात आली.






