Jyoti Waghmare slams Manoj Jarange Patil
मुंबई: मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील आहे. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, मात्र यातून शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यापुढे टीका केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा तपशील खासदार डॉ. वाघमारे यांनी सादर केला. मुंबईत बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या की, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच न्यायमूर्ती शिंदे समिती, न्यायमूर्ती शुक्रे आयोग गठित करुन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु केली. लाखो कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील ५२०० अधिसंख्य पदांवरील मराठा उमेदवारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी देखील केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांकडे बघितले पाहिजे, असे खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील बिनव्याजी कर्जाची मर्यादा १० लाखांवरुन १५ लाख करण्यात आली. महामंडळाकडून आतापर्यंत १६७० कोटींहून अधिक कर्ज वितरित केले असून १ लाख ७० हजारांहून अधिक मराठा बाधंवांना या योजनेचा लाभ झाला, असे त्या म्हणाल्या. मराठा आरक्षण आंदोलनातील ३६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि २० मृत व्यक्तींच्या वारसांना एसटीमध्ये नोकरी दिली. ईडब्ल्यूएस, एसईबीसी, आणि ओबीसी प्रवर्गातील मुलींना वैद्यकीय व अभियांत्रिकीसह ८०० हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १००% फी माफी देण्यात आली. सारथी संस्थेला राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी देण्यात आला. सारथीच्या ६ विभागीय कार्यालयासाठी आणि दोन उपकेंद्रांसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करुन दिली. तसेच पुण्यातील कार्यालयासाठी ४२ कोटींचा निधी दिला. एकनाथ शिंदे हे शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेले आणि मुख्यमंत्रीपदावर पर्यंत पोहोचलेले मराठा समाजातलेच आहेत. त्यामुळे मराठा बांधवांबाबत शिंदे साहेबांना तळमळ असून समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे.
मराठा समाजाच्या मूक मूर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या कल्याणासाठी झटणारे शिंदे साहेब यांचाही विचार जरांगे यांनी केला पाहिजे. शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्याचा समाजाला झालेल्या फायद्यांचा जरांगे यांनी अभ्यास केल्यास ते टीका थांबवतील. शिंदे साहेबांवर होणारी टीका मराठा समाज देखील सहन करणार नाही, असे खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार संवेदनशील आहे. संवादाने प्रश्न सोडवता येतात, त्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले वातावरण खराब होऊ नये. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य आणि सामाजिक अखंडता टिकली पाहिजे, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असे खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या.
धनुष्यबाण हे केवळ निवडणुकीचं चिन्ह नाही तर मराठी माणसाचा अभिमान आहे. तो मराठी माणसाचा ताठ कणा आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाचा जीव की प्राण आहे, असे खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या. बाळासाहेबांनी देवघरात धनुष्यबाण पुजला तो गोठवण्याची मागणी करताना लाज वाटत नाही का? अशी घणाघाती टीका खासदार डॉ. वाघमारे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. धनुष्यबाण काँग्रेसच्या पायाशी गहाण टाकला होता तो एकनाथजी शिंदे यांनी सन्मानाने सोडवून धनुष्यबाणाची आन, बान आणि शान टिकवण्याचे काम केले. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांच्या शरिरातील रक्त गोठलं आहे, त्यांच्या रक्तातला स्वाभीमान गोठलाय, त्यांच्या रक्तातील मराठी अस्मिता गोठलीय म्हणून ते अशी मागणी करतायेत अशी टीका खासदार डॉ. वाघमारे यांनी केली.






