
शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त
मुंबई : शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अद्याप दप्तर आणि इतर २७ प्रकारच्या शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. या विलंबावरून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ‘शाळा सुरू होऊनही वस्तू मिळत नसतील, तर गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे? प्रशासनाने दप्तराची लक्तरं वेशीवर टांगली आहेत’, अशा अत्यंत तिखट शब्दांत सदस्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. कंत्राटदाराची निवड, विलंबाचे कारण आणि वस्तूंची गुणवत्ता या मुद्द्यांवरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते.
चर्चेची सुरुवात करताना शिवसेना (ठाकरे गट) सदस्या मीनाक्षी पाटणकर यांनी शालेय वस्तूंच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी प्रशासनाला घेरताना विचारले की, शालेय वस्तू वेळेत मिळतील असा गाजावाजा करण्यात आला होता, मग त्याचे काय झाले? या कामात १० कंत्राटदार बाद का झाले आणि ज्या कंत्राटदाराला काम दिले आहे, त्याला भूतकाळात दंड झाला असताना वस्तूंची गुणवत्ता कशी राखली जाईल ? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. सईदा खान आणि ठाकरे गटाच्या लक्ष्मी भाटिया यांनी वस्तूंच्या गुणवत्तेवर आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप केले. नव्या ठेकेदाराची नेमणूक झालेली असतानाही जुन्याच वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जाण्याची भीती व्यक्त करत पालिकेच्या गोदामांमध्ये पडून असलेली जुनी दप्तरे प्रशासनाने तातडीने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी डॉ. खान यांनी केली. काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी संतापून थेट वाटप कार्यक्रमांवरच बहिष्कार टाकल्याचे सांगितले.
खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
यावर भाष्य करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, “ज्या ठेकेदारांनी नमुने सादर केले नाहीत, त्यांनाच प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, सध्या पात्र ठेकेदारांकडून वस्तूंचा पुरवठा सुरू असून येत्या काही दिवसात तो पूर्ण होईल. सर्व शालेय वस्तूंची आणि दप्तरांची ‘लॅब टेस्टिंग’ झाली असून विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार काळजी घेऊन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तयार करण्यात आल्या आहेत, ‘जेम’ पोर्टलमुळे उशीर झालेला नसून हा प्रक्रियेचाच एक भाग आहे, तरीही पुढील वर्षी सर्व वस्तू वेळेत दिल्या जातील.”
जून महिना संपत आला तरी शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत; पालिकेने मोफत वस्तूंची सवय लावल्याने पालकांनी स्वतः सोय केली नाही आणि आज पालिका त्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे उशीर करणाऱ्या कंत्राटदाराला थेट काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी मिरांडा यांनी केली. पुढे बोलताना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांनी या विलंबासाठी ‘जेम’ पोर्टल कारणीभूत असल्याचा आरोप केला. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मुलांचा गोंधळ उडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या वजनाची आणि रंगांची दप्तरे देण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा