फोटो सौजन्य - Social Media
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. कॉपी होऊ नये म्हणून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल १८३ कॉपी प्रकरणे समोर आली असून, सहा ठिकाणी सामूहिक कॉपी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनांमुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याची चर्चा सुरू आहे.
सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी असलेल्या ३१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर पुढील शिस्तभंगात्मक कारवाईची प्रक्रिया देखील सुरू असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे.
विभागनिहाय पाहता, पुणे विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. एकंदरीत, पुण्यात एकूण ३४ कॉपी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच ठिकाणी कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर अमरावती विभागात एका केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याचे समोर आले आहे. एकूण १०९ गंभीर गैरप्रकारांची नोंद झाली असून, विविध केंद्रांवर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राज्यातील सुमारे ९५ टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच सीसीटीव्हीच्या मदतीने अनेक सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी मंडळाकडून अतिरिक्त दक्षता घेतली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही कॉपीचे प्रकार समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा हा केवळ दावा न राहता प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.






