फोटो सौजन्य- सोशल मीडिया
PM Modi IIT Delhi convocation speech : आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तसेच शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना जीवनाशी संबंधित महत्त्वाचे धडे दिले. त्यांनी विविध क्षेत्रांवर चर्चा करण्यासोबतच ‘एआय’चे महत्त्वही अधोरेखित केले.
या कार्यक्रमात ३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, तर ५८७ पीएचडी स्कॉलर्सनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर्स गोल्ड मेडल आणि परफेक्ट १० गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी एआयवर आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकंप्यूटर ‘परम प्रज्ञा’चे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आयुष्याचा गुरुमंत्र देताना सांगितले की, जेव्हा एखादी अडचण मोठी वाटू लागते, तेव्हा तिला लहान-लहान भाग करावेत. तसेच ते पुढे म्हणतात. आयुष्यात अडचणी येणारच, पण संकटांचा स्वभाव असतो की ती कधीही एकटे येत नाहीत; जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्यासोबत संधीही येतात. आयआयटी दिल्लीने जे शिकवले आहे, ते नेहमी लक्षात ठेवा. कॅम्पसचे जीवन आणि कॅम्पसबाहेरील जीवन यामध्ये खूप मोठा फरक असतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, आयआयटीच्या परीक्षेत फक्त सिलॅबस असतो, परंतु आयुष्याची परीक्षा ही ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असते. यशस्वी लोकांच्या यशाचे कारण फक्त योग्य उत्तरे देणे हे नसते, तर ज्या प्रश्नांकडे जगाने दुर्लक्ष केले, ते प्रश्न ओळखणे आणि त्यांच्यावर उपाय शोधणे हे असते. आयुष्यात नेहमी कुतुहल (क्युरिऑसिटी) टिकवून ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
AI in ZP School: जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल! एआयच्या मदतीने तयार केले ॲनिमेटेड व्हिडिओ
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, हा देश स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीचे दुःख, तपस्या आणि बलिदानाचे फळ आहे. आपल्या आयुष्यातील आव्हाने वेगळी आहेत आणि जबाबदाऱ्याही वेगळ्या आहेत.
पंतप्रधान विद्यार्थ्यांना म्हणाले की, पुढील ३० ते ३५ वर्षांत तुम्ही जे काही कराल, ते आपल्या ‘विकसित भारत’च्या प्रवासावर प्रभाव पाडेल. तुम्ही जे काही कराल, त्याचा भारतावर कसा परिणाम होईल, याचा विचार करा. आज देशातील एखादा तरुण अभियंता असे म्हणत आहे की, ‘First in My Bloodline to Build a Rocket’
त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली जात आहे. पुढे स्टार्टअपची संधी दिली जात आहे. यासाठी रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे देशातील विज्ञान आणि संशोधनाला नवी ताकद मिळू शकेल.






