
अडचणींवर मात करत रेणुकाची यूपीएससीमध्ये झेप
अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षेचा कठीण प्रवास केला पार
रेणुकाने ‘नवराष्ट्र’षी साधला खास संवाद
सोनाजी गाढवे/पुणे: संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीने आपल्या जिद्द, सातत्य आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर हे यश संपादन केले. लहानपणापासून प्रशासनात काम करण्याचे स्वप्न पाहिलेल्या रेणुका केकण या (एचआय) हिअरिंग एड होत्या आणि त्यांनी अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षेचा कठीण प्रवास पार केला. त्यांच्या या यशानंतर ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्रवासातील संघर्ष, कुटुंबाची साथ आणि अभ्यासातील अनुभव सांगितले.
१.यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि कसा घेतला?
-मला लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची इच्छा होती. चौथी-पाचवीत असताना मी प्रथमच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी पाहिले आणि त्यांचे काम पाहून प्रेरणा मिळाली. त्यानंतर नववी-दहावीमध्ये असताना हा निर्णय अधिक ठाम झाला. त्या वेळी मला वाटायचे की सामान्य कुटुंबातील मुलगीही हे करू शकते का? पण जसजशी मी अभ्यास करत गेले आणि इतर विद्यार्थ्यांशी तुलना करत गेले, तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. तेव्हाच मी ठरवले की मला यूपीएससी करून प्रशासनात अधिकारी व्हायचे आहे.
प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा
२.प्रवासात तुमच्या कुटुंबाची साथ कशी मिळाली?
-माझ्या यशामागे कुटुंबाची मोठी भूमिका आहे. माझे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते नेहमी मला म्हणायचे की “तुझ्या सहीसाठी लोकांची रांग लागली पाहिजे.” त्यांच्या त्या वाक्याने मला खूप प्रेरणा मिळाली. माझ्या आईनेही मला खूप भावनिक आधार दिला. जेव्हा कधी मी खचून जायचे तेव्हा मी आईला फोन करायचे. तिच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा अभ्यास करण्याची उभारी मिळायची.
३.अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली?
-लहानपणापासून मला ऐकण्यासंबंधी काही अडचणी होत्या. अनेक गोष्टींचे आवाज मला ऐकू येत नव्हते. दहावीनंतर मशीन लावल्यानंतर मला अनेक आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले आणि ते माझ्यासाठी नवीन अनुभव होते. सुरुवातीला अभ्यासात अडचणी आल्या, परंतु मी हार मानली नाही. २०२३ मध्ये ‘दीपस्तंभ’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाची साधने मिळाली. त्यामुळे माझा अभ्यास अधिक चांगला झाला.
४.कधी निराशा किंवा थकवा जाणवला का? त्या वेळी तुम्हाला उभारी कशी मिळाली?
– यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेची तयारी करताना कधी कधी थकवा आणि निराशा येत होती. विशेषत पीडब्ल्यूडी आणि सामान्य पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिक आव्हानात्मक असतो. अशा वेळी मी माझ्या आई-वडिलांची आठवण काढायचे आणि त्यांच्याशी बोलायचे. त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मला पुन्हा उभारी द्यायचा. तसेच मित्र, कॉलेजमधील शिक्षक आणि दीपस्तंभमधील मार्गदर्शकांनीही मला सतत साथ दिली.
UPSC ची तयारी कशी करावी? जाणून घ्या योग्य मार्ग आणि यशाचे सूत्र
५.तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
-मी इतकेच सांगू इच्छिते की आपण एखादी गोष्ट मनापासून आणि सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्की साध्य होते. माझ्यासारख्या परिस्थितीतून जर मी हे करू शकले, तर या जगात कोणीही करू शकते. मेहनत, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे.