
धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?
देवेंद्र वाघ, सटाणा: शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाह होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत.
मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मिडिया आणि विविध चॅटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.
घर सोडून जाण्याच्या निर्णयामागे प्रेम किंवा स्वातंत्र्याची भावना असली तरी वास्तव वेगळे असते. आर्थिक अडचणी, सामाजिक बहिष्कार, कायदेशीर गुंतागुंत आणि कुटुंबीयांपासून तुटलेले संबंध या समस्या उभ्या राहतात. काही तरुण-तरुणींना परत येताना मानसिक ताण आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागतो. अल्पवयीनांच्या प्रकरणात कायदेशीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असते, ज्यामुळे संबंधितांवर गंभीर परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते शाळा व महाविद्यालयांत समुपदेशन शिबिरे, कायदेशीर माहिती व जनजागृती कार्यक्रम, पालकासाठी मार्गदर्शन कार्यशाळा, डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण, कौटुंबिक समुपदेशन केंद्रांची स्थापना यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत. मुलांना आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असला तरी निर्णय प्रक्रियेत पालकांचा विश्वास आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरते. त्याचप्रमाणे पालकांनीही केवळ बंधने लादण्याऐवजी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भावनिक आधार देणे गरजेचे आहे. धर सोडून जाण्याच्या वाढत्या घटना ही केवळ कायद्याची समस्या नसून सामाजिक आणि भावनिक आव्हान आहे. मुलांच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देत आणि कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सटाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अनेक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे. मात्र केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता समाज, कुटुंब आणि शैक्षणिक संस्था यांनीही जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.