
धक्कादायक ! 'लग्नाला नकार का देतेस' म्हणत विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार; नंतर आरोपीने स्वत:..
जुन्नर : बारव (जुन्नर) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कॉलेजला जाण्यासाठी वसतिगृहाबाहेर पडली. सरकारी ग्रामीण रुग्णालयामागील पत्र्याच्या शेडजवळ ती आली असता, आरोपी महेश डामसे याने तिला रस्त्यात अडवून, ‘लग्नाला नकार का देतेस?’ असे म्हणून तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने वार केले. तरुणीने बचावासाठी डोक्यावर हात आडवा धरला असता तिच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. यामध्ये संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खाजगी रुग्णालत उपचार सुरु आहेत.
महेश मुरलीधर डामसे (वय २०, रा. आंबे, ता. जुन्नर) असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डामसे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जुन्नर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध सुरू केला. त्याच्या दुचाकीचे लोकेशन गणेशखिंड घाट उतरताना एका हॉटेलजवळ काही वेळ दिसले. मात्र, त्यानंतर दुचाकी दिसून न आल्याने पोलिसांनी सुमारे पाच ते सहा किलोमीटर डोंगर परिसरात शोधमोहीम राबवली. या शोधदरम्यान एका ठिकाणी आरोपीची दुचाकी गुरुवारी आढळली. तेथून काही अंतरावरच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. युवतीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
हेदेखील वाचा : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
दरम्यान, या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस कर्मचारी दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे तसेच जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद गटकळ याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बारव पाडळी येथे आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव प्रकल्पांतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी निवासी राहून शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेतात. या घटनेमुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्लाप्रकरणानंतर पालकही संतप्त
शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त केली जात आहे. यापुढील काळात अशा घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पाडळी बारवचे ग्रापंचायत सदस्य राजेश कारभळ यांनी केली.