
घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
३५ वर्षीय विवाहिता पतीसह मजुरी करून उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वी ऊसतोडीच्या कामासाठी गंगापूर येथे गेल्यानंतर तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्राम व मोबाइलवरून संपर्क सुरू होता. १५ जुलै रोजी पीडितेचा सावत्र भाऊ उपचारासाठी घाटीत दाखल असल्याने पीडिता तेथे गेली होती. रात्री नऊच्या सुमारास आरोपीने फोन करून आपण घाटीतच असल्याचे सांगितले. काही वेळाने पीडिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपी तेथे आला.
आपले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन, अशी धमकी देत त्याने पीडितेला सोबत येण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने पीडितेचा मोबाइल हिसकावून घेतला. दुचाकीवर बसवून रात्रभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पवनचक्क्या असलेल्या परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे तु माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली.
विवाहितेला डांबून ठेवत केला अत्याचार
पीडितेने नकार देत विरोध केला माञ आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. सलग दोन दिवस पीडितेला शेडमध्ये डांबुन ठेवत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. १७ जुलै रोजी सकाळी पीडितेने मुलांची आठवण येत असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने तिला नेवासा येथे आणून बसमध्ये बसवले. तसेच पुन्हा आपल्याकडे आली नाही तर तिला व तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
पोलिस ठाणे गाठून केला पीडितेने गुन्हा दाखल
गावी परतल्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी हा नेवास येथे असल्याची माहिती मिळताच केदारे यांच्या पथकाने राजू माळी याला नेवास्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मनिषा केदार करीत आहेत.