
जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
लासूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीजवळ हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला तातडीने अटक केली आहे. मयूर राजेंद्र शिरसाठ (वय ३१, रा. अशोक कॉलनी, लासूर स्टेशन) हे मित्र विलास त्रिभुवन यांच्यासोबत चहाच्या टपरीजवळ गप्पा मारत असताना शंकर विष्णू शिरवटे, बाबा सखाराम कडमिंचे आणि आदित्य राजू पवार हे दुचाकीवरून तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आल्यानंतर शंकर शिरवटे याने हातातील लोखंडी कोयत्याने मयूर यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्यांच्या डाव्या मानेवरही वार – करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अन्य दोन्ही आरोपींनी मयुर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यांचा मित्र विलास त्रिभुवन हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता आरोपींनी त्यालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्ररकणी रात्री १०.१२ वाजता शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे करत आहेत.