
माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर
ओतूर/मनोहर हिंगणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टिटवाळा येथून जुन्नरला जाण्यासाठी उबेर कार बुक करून मध्ये बसल्यानंतर चालकाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. टिटवाळा, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या घटनेत नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी (वय २६, रा. ऐरोली, नवी मुंबई) या चालकाचा मृत्यू झाला आहे.
दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आरोपी आदर्श भालेराव याने टिटवाळा येथून जुन्नरला जाण्यासाठी नासीर अन्सारी यांची ‘इर्टिगा’ कार (क्र. MH 03 DV 6403) उबेर ॲपद्वारे बुक केली होती. माळशेज घाटमार्गे प्रवास करत असताना सितेवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीतील गणेशखिंड घाटात ही घटना घडली आहे. नासीर अन्सारी बेपत्ता झाल्याने त्यांच्या भावाने ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ७ मार्च रोजी गणेशखिंड घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उबेर कंपनीकडून मिळालेली माहिती आणि कारचे जीपीएस लोकेशन तपासले असता, कार जुन्नरला न जाता पुन्हा टिटवाळ्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आदर्श भालेराव याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, गणेशखिंड घाटात लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता चालक नासीर आणि आरोपी यांच्यात पैशांवरून वाद झाला. चालकाने चाकूने धमकावल्याचा दावा आरोपीने केला आहे. या झटापटीत आरोपीने नासीरच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर खोलवर वार केले. नासीरचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह सिमेंटच्या कठड्यावरून खाली फेकून दिला आणि कार घेऊन पुन्हा टिटवाळ्याच्या दिशेने पसार झाला. ही कार त्याने टिटवाळा-गोवेली दरम्यान सोडून दिली होती.
दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी लहू थाटे, पीएसआय संदीप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, नामदेव बांबळे, बाळशिराम भवारी, देविदाव खेडकर, भरत सुर्यवंशी, आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान न्यायालयाने आरोपीला १२ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.